Home कोरोना परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कल्याण स्टेशनवर अँटीजन बंधनकारक – केडीएमसी आयुक्तांचे निर्देश

परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कल्याण स्टेशनवर अँटीजन बंधनकारक – केडीएमसी आयुक्तांचे निर्देश

 

कल्याण दि.20 मे :
राज्य शासनाने आदेश देऊनही परराज्यातून येणारे नागरिक कोणत्याही कोवीड चाचणीविना कल्याण स्टेशनवर दाखल होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. यामुळे कल्याण डोंबिवलीत आटोक्यात येत चाललेला कोरोना पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण स्टेशनवर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची अँटीजन टेस्ट बंधनकारक करण्याचे निर्देश केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. महापालिका वैद्यकीय अधिकारी आणि ल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आज कल्याण स्टेशनचा पाहणी दौरा करण्यात आला.

परराज्यातून महाराष्ट्रात परत येणाऱ्या नागरिकांनी 48 तास अगोदरचा आरटीपीसीआर किंवा अँटीजन अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. रस्तेमार्गाने महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या नागरिकांबाबत या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असताना रेल्वेने येणारे नागरिक मात्र कोणत्याही चाचणीविना दाखल होत आहेत. मध्य रेल्वेचे महत्वाचे स्थानक असणारया कल्याण रेल्वे स्थानकातील परिस्थितीही काही वेगळी नाहीये.

 

अशा प्रकारच्या बेजबाबदारपणाचा फटका राज्यात आणि कल्याण डोंबिवलीत आटोक्यात येऊ लागलेल्या कोवीड परिस्थितीला बसू शकतो. कल्याण डोंबिवलीतही गेल्या महिन्यात अडीच हजारांच्या घरात गेलेले कोरोना आकडे आज 200 पर्यंत खाली आले आहेत. मात्र कल्याण रेल्वे स्टेशनद्वारे शहरात दाखल होणारे बहुतांश नागरिक हे कोणत्याही चाचण्या न करताच येत आहेत. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रेल्वेचे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव, स्टेशन मॅनेजर अनुपकुमार जैन, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे, अँटीजन टेस्ट करणाऱ्या खासगी कंपनीच्या प्रिती ससाणे यांच्यासह रेल्वे पोलीस, आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कल्याण डोंबिवलीचे आकडे 200 पर्यंत आलेले असून इथली लोकसंख्या नियंत्रणात आली आहे. मात्र कल्याण स्टेशनवर उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालवरून येणाऱ्या नागरिकांमूळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे अँटीजन टेस्टिंग करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केडीएमसी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तर अँटीजन टेस्टला न करता गेलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईचा विचारही करत असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

ब्रेक द चैनच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करणार आहे. परराज्यातून कल्याण स्टेशनवर दाखल होणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर किंवा अँटीजन टेस्ट रिपोर्ट नसल्यास अँटीजन टेस्ट करूनच त्यांना बाहेर सोडले जाईल अशी माहिती एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा