Site icon LNN

स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत ३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा रॅलीतून नेण्याचा विश्वविक्रम ; हजारो देशप्रेमी विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

– World Records India, Asia Book of Records आणि India Book of Records यांच्या अधिकृत नोंद प्रक्रियेत विक्रमी उपक्रमाची नोंद

– खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सहभागी विद्यार्थी, संस्था आणि नागरिकांचे मानले आभार

डोंबिवली | १५ ऑगस्ट
देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा उत्सव देशप्रेम, राष्ट्राभिमान आणि सामाजिक एकतेच्या अभूतपूर्व सोहळ्यात रूपांतरित करत डोंबिवलीत १५ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि डोंबिवलीतील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक रॅलीत हजारो नागरिकांनी एकत्र येत तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हातात घेऊन मार्गक्रमण केले. तर सुमारे १० हजार हुन अधिक विद्यार्थी आणि नागरिक यांच्या सहभागातून हा तिरंगा रॅलीतून नेण्यात आला. तर याची ‘ वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडीया, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. या भव्य उपक्रमातून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. तर या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सहभागी विद्यार्थी, संस्था आणि नागरिकांचे आभार मानले. (Dombivli Sets World Record with 35,000-Sq-Ft Tricolour Rally on Independence Day; Thousands of Patriotic Students & Citizens Join In)

‘तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला डोंबिवलीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि डोंबिवलीतील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या वतीने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीसाठी सकाळी नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र आले. यानंतर डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारडा सर्कल) येथील हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारकाला अभिवादन करून विशाल तिरंगा घेऊन रॅलीला सुरुवात झाली.

अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण…
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली ही तिरंगा रॅली लोकमान्य टिळक पुतळा, चार रस्ता, नेरुरकर पथ मार्गे दत्तनगर चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाली. हजारो नागरिकांच्या हातात डौलाने फडकणारा विशाल तिरंगा आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण डोंबिवलीचा परिसर राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने भारून गेला. रॅलीचा समारोप दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ झाला. यावेळी १५० फूट उंच ध्वजस्तंभावर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तिरंग्याच्या साक्षीने झालेला हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक ठरला.

१० हजारांहुन अधिक विद्यार्थी, १०० हून अधिक सामाजिक संस्था…
या ऐतिहासिक रॅलीमध्ये डोंबिवली आणि परिसरातील ५० हून अधिक शाळांमधील सुमारे १० हजार हुन अधिक विद्यार्थी, १०० हून अधिक सामाजिक संस्था, माजी सैनिक, स्काऊट-गाईड, एनसीसी आणि एनएसएसचे कॅडेट, साहित्य, कला, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध क्षेत्रांत राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर गौरविले गेलेले डोंबिवलीकर सहभागी झाले. विविध क्षेत्रांतील सुमारे २५ हजार नागरिकांनी या राष्ट्रभक्तीच्या सोहळ्यात सहभाग नोंदवत तिरंग्याला मानवंदना दिली.

‘मुसळधार पावसातही तिरंग्यासाठी डोंबिवलीकरांचा उत्साह कायम…

रॅलीच्या सुरुवातीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू असतानाही डोंबिवलीकरांचा उत्साह आणि राष्ट्रभक्ती कुठेही कमी झाली नाही. पावसाची तमा न बाळगता हजारो विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या विश्वविक्रमी तिरंगा रॅलीत सहभागी झाले. तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देशप्रेमाचा अभिमान दिसत होता. विशेषतः लहान मुलांनी आज केवळ हातात राष्ट्रध्वज घेतला नाही, तर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची जबाबदारीही आपल्या खांद्यावर घेतल्याचा संदेश या माध्यमातून दिला असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

भारताकडे आज संपूर्ण जग महासत्ता म्हणून पाहत आहे…
भारताकडे आज संपूर्ण जग महासत्ता म्हणून पाहत आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताने आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, देशाची ही वाटचाल अधिक वेगाने पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, देशातील युवकांनी आपल्या सामर्थ्याचा आणि ज्ञानाचा उपयोग भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी केला पाहिजे. देश अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि सामर्थ्यवान करण्यासाठी प्रत्येक तरुणाने योगदान देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले.

डोंबिवलीच्या सामाजिक एकता आणि राष्ट्रप्रेमाची मोठी ताकद…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ ही संकल्पना मांडली. त्याच राष्ट्रभक्तीच्या भावनेतून डोंबिवलीत ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा घेऊन विश्वविक्रमी रॅलीचे आयोजन करण्यात आले. तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो देशाच्या एकतेचा, अखंडतेचा, त्यागाचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे. त्यामुळे एका विशाल तिरंग्याखाली हजारो नागरिकांनी एकत्र येणे ही डोंबिवलीच्या सामाजिक एकतेची आणि राष्ट्रप्रेमाची मोठी ताकद आहे, असेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

मुसळधार पावसातही हजारो नागरिकांचा उत्साह…
या ऐतिहासिक विश्वविक्रमी तिरंगा रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा, सामाजिक संस्था, माजी सैनिक, एनसीसी-एनएसएसचे विद्यार्थी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि डोंबिवलीकर नागरिकांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष आभार मानले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही हजारो नागरिकांनी दाखवलेला उत्साह हा या उपक्रमाचे खरे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्वांच्या सामूहिक सहभागामुळेच डोंबिवलीच्या भूमीत एवढ्या मोठ्या स्वरूपाचा राष्ट्रभक्तीचा सोहळा साकारता आला आणि विश्वविक्रमी तिरंगा रॅली यशस्वी झाली. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने देशाच्या तिरंग्याचा सन्मान अधिक उंचावला असून, डोंबिवलीकरांनी आज देशप्रेम आणि सामाजिक एकतेचा एक आदर्श निर्माण केला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

एक तिरंगा, एक देश, एक अभिमान’ या भावनेचा प्रत्यय…
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विशाल तिरंगा रॅलीच्या विक्रमाची अधिकृत नोंद प्रक्रिया. World Records India, तसेच Asia Book of Records आणि India Book of Records यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक उपक्रमाची नोंद करण्यात आली. त्यामुळे डोंबिवलीत साकारलेला हा तिरंगा सोहळा केवळ स्वातंत्र्य दिनाचा उत्सव न राहता विक्रमाच्या दिशेने वाटचाल करणारा ऐतिहासिक क्षण ठरला. रॅलीच्या संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर गीते, घोषणांनी वातावरण भारून गेले होते. विविध ठिकाणी देशभक्तीपर गीतांचे आणि नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांपासून माजी सैनिकांपर्यंत, सामाजिक संस्थांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत समाजातील विविध घटकांनी एकाच तिरंग्याखाली एकत्र येत ‘एक तिरंगा, एक देश, एक अभिमान’ या भावनेचा प्रत्यय दिला. तसेच या रॅलीमध्ये विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही सहभागी झाले. त्यामुळे पक्षीय भेद बाजूला ठेवून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी सर्वजण एकत्र आल्याचे चित्र डोंबिवलीत पाहायला मिळाले. ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा, हजारो नागरिकांचा सहभाग आणि विश्वविक्रमाच्या अधिकृत नोंद प्रक्रियेमुळे डोंबिवलीतील हा तिरंगा रॅलीचा सोहळा कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय अध्याय ठरला आहे. डोंबिवलीकरांच्या सामूहिक सहभागातून साकारलेला हा राष्ट्रभक्तीचा महाउत्सव महाराष्ट्राच्या आणि देशाच्या तिरंग्याचा गौरव अधिक उंचावणारा ठरला आहे.

Exit mobile version