Home क्राइम वॉच कल्याणच्या ग्रामीण भागात गावठी दारूच्या हातभट्टीवर एक्साईजची मोठी कारवाई

कल्याणच्या ग्रामीण भागात गावठी दारूच्या हातभट्टीवर एक्साईजची मोठी कारवाई

 

कल्याण दि.23 सप्टेंबर :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण आणि ठाणे भरारी विभागीय पथकाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माणेरे गावात कारवाई करत ६३ हजार ३०० लिटर नवसागर मिश्रित रसायनाचा साठा नष्ट केला.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या दारू निर्मितीचे निर्माण झालेले तळ उध्वस्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. झाडाझुडपात निर्माण केली जाणारी गावठी दारू बाजारात येण्याआधीच उद्ध्वस्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला यश आले आहे. उल्हासनगर आणि कल्याण शहराला लागून असणाऱ्या माणेरे गावात दारू माफियांनी मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत १४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दारु माफियांचे धाबे दणाणले असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी दारू ग्रामीण भागातून शहराकडे घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला ४० लिटर दारूसह दुचाकी आढळून आली आहे. मात्र या गाडीवरील चालक फरार झाला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे विभागीय दुय्यम निरीक्षक आर.एन.राणे तपास करत आहेत.

दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आवश्यक साहित्य नसल्याने कारवाई दरम्यान पथकांना मोठी अडचण निर्माण होत होती. मात्र आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक इंजिन आणि ड्रोन उपलब्ध झाल्याने दारू निर्मितीचे तळ शोधण्याला गती येत आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील स्मार्ट झालेला दिसून येत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा