Home ठळक बातम्या अखेर गांधारी पूल वाहतुकीसाठी झाला खुला; पोलिसांनी हटवले बॅरिकेट्स

अखेर गांधारी पूल वाहतुकीसाठी झाला खुला; पोलिसांनी हटवले बॅरिकेट्स

 

कल्याण दि.27 जुलै :
कल्याण – पडघा मार्गावरील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या गांधारी पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. पुलाच्या खांबाला कोणतेही तडे गेले नसल्याचे तसेच हा उड्डाणपूल सुस्थितीत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आल्याने या पुलावरील वाहतूक सुरू केल्याची माहिती कल्याण शहर वाहतूक पोलीस शाखेचे एसीपी उमेश माने पाटील यांनी एलएनएन न्यूजला दिली. तर गांधारी पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाल्याने हजारो नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

गांधारी पुलाच्या खांबाला तडे गेल्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे काल रात्री 10 वाजल्यापासून इथली वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज दुपारी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पुलाला कोणतेही तडे गेलेले नसून पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या काळ्या कापडाने सर्व गोंधळ उडाल्याचे समोर आले. त्यामुळे गांधारी पूल वाहतुकीसाठी आज संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा खुला करण्यात आल्याची माहिती ट्रॅफिक एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली. तसेच वाहतुक बंद करण्यासाठी घालण्यात आलेले बॅरिकेट्सही तातडीने बाजूला करण्यात आले. गांधारी पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असून नागरिकांनी त्याचा वापर करण्याचे आवाहनही वाहतुक पोलिसांनी केले आहे.
दरम्यान हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाल्याने पुला पलीकडे राहणाऱ्या गावातील हजारो नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पूल बंद असल्याने अनेकांना भिवंडीमार्गे लांबचा वळसा घालून ये-जा करावी लागली. मात्र पूल सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा