Home ठळक बातम्या 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा : धोकादायक होर्डिंग्ज त्वरित काढण्यासह धोकादायक इमारतीही रिकाम्या...

4 दिवस अतिवृष्टीचा इशारा : धोकादायक होर्डिंग्ज त्वरित काढण्यासह धोकादायक इमारतीही रिकाम्या करण्याचे केडीएमसी आयुक्तांचे आदेश

 

कल्याण-डोंबिवली दि.7 जून :
येत्या 4 दिवस कोकणातील ठाण्यासह चारही जिल्ह्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामूळे कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर उभारण्यात आलेली 3 भलीमोठी होर्डींग कोसळून काही जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या काळातही अशा दुर्घटना होऊ नये यासाठी धोकादायक असणारी सर्व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. (Immediate removal of all hoardings that are dangerous Orders of KDMC Commissioner)

हवामान खात्याने 9 जूनपासून पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने सर्व संबंधित विभागांची ऑनलाईन बैठक बोलून आवश्यक त्या सूचना दिल्या. यात अतिवृष्टीच्या काळात धोकादायक इमारतीही तातडीने रिकाम्या करण्याचे निर्देश सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले. तसेच अतिवृष्टीच्या काळात 3 दिवस पुरेल इतका डिझेलचा साठा करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तर ज्या ज्या ठिकाणी झाडे पडण्याची शक्यता असणाऱ्या वृक्षांची छाटणी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
तर सखल भागात पाणी तुंबू नये याकरिता छोटे नाले आणि गटारं प्राधान्याने साफ करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच गोविंदवाडीसारख्या अतिसखल भागात अतिवृष्टीच्या काळात पाणी शिरण्याआधीच तेथील तबेले रिकामे करून गुरांची बाहेरील बाजूस आणि रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

तर महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयात विद्युत पुरवठा सतत चालू राहणे आवश्यक असल्याने अतिवृष्टी काळात रिस्टोरेशनची व्यवस्था करण्यासंदर्भातील सूचनाही महावितरणच्या कार्यकारी अभियंतांना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीच्या काळात तातडीच्या परिस्थितीसाठी परिवहन विभागाने बसेसची सुविधा नागरिकांसाठी सज्ज ठेवण्याबाबत निर्देश आयुक्तांनी परिवहन विभागाचे उपायुक्त दीपक सावंत यांना देण्यात आले असून सर्व विभागीय उपायुक्तांनी त्यांच्या प्रभागात भेट देऊन एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देशही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा