Home ठळक बातम्या …नाही तर रस्त्यावर पडलेले दगड पालिकच्या दिशेने भिरकावले जातील – आमदार रविंद्र...

…नाही तर रस्त्यावर पडलेले दगड पालिकच्या दिशेने भिरकावले जातील – आमदार रविंद्र चव्हाण

 

कल्याण – डोंबिवली दि.24 जुलै :
“डोंबिवली कल्याणकर नागरिकांचा अंत पाहू नका आणि लवकरात लवकर रस्तेदुरुस्ती करा. नाहीतर रस्त्यावर पडलेले हेच सुटे दगड नागरिकांच्या हातात असतील आणि ते एक दिवस महापालिकेच्या दिशेने भिरकावले जातील” अशा तिखट शब्दांत डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसी आयुक्त आणि प्रशासनावर हल्ला चढवला आहे. मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून आमदार चव्हाण यांनी पालिका प्रशासनाला लक्ष्य केले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. याबाबत आपल्याला माहित असेलच, पण आपल्या अधिकाऱ्यांना याची जाणीव कधी होईल आणि ते स्वतःहून उपाययोजना करतील असे प्रश्न उपस्थित करत आजपर्यंत आपण वाट पाहत होतो असे आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच आपला अपेक्षाभंग झाला नसून अधिकारी स्वतःहून हे काम करतील अशी आपली अपेक्षाच नव्हती. यावरून आपले अधिकारी आणि प्रशासक म्हणून आपण पुन्हा एकदा नगरसुविधा क्षेत्रात नापास झाल्याची टिका आमदार चव्हाण यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर केली आहे.

तर महापालिका क्षेत्रात पडणारा पाऊस आणि रस्त्यांवर पडणारे खड्डे प्रशासनाला चांगलेच परिचयाचे आहेत. रस्त्यांच्या डागडुजीसाठी मास्टेक कार्पेटसारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरणे सहज शक्य असताना आणि खड्ड्यांसाठी बजेट प्रोव्हिजन असतानाही पावसाळ्यापूर्वी निविदा काढून खड्डे का भरले नाहीत? रस्त्यांची झालेली चाळण यासाठी आपले सुस्त प्रशासन आणि बेदरकार वृत्ती जबाबदार असल्याचेही आमदार चव्हाण यांनी सांगितले. डोंबिवली पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करून ऑगस्टअखेर वाहतुकीसाठी खुला करणे अत्यावश्यक झाले आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीने डोंबिवलीकर त्रस्त झाले आहेत. कोपर पुलामुळे पूर्व-पश्चिम वाहतूक विभागली जाऊन कोंडी कमी होण्यासाठी संथ पद्धतीने चाललेल्या कामाला गती देण्याची गरजही आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

खड्ड्यात पडून कल्याण डोंबिवलीतील अपघात होण्याचे प्रमाण मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक असते. यापूर्वी रस्त्यावरचे खड्डे, इतस्त्तः पडलेले दगड धोंडे यामुळे वाहतूक खोळंबा तर होतोच पण रस्त्यावर पसरलेल्या दगडांनी वाहनचालकही गंभीर जखमी झालेत आणि नागरिकांचे बळीही खड्ड्यांनी घेतले आहेत. याकरीता महापालिका प्रशासन दोषी असल्याचे सांगत या घटनांमधून पालिका प्रशासन काहीच बोध न घेण्याएवढी यंत्रणा संवेदनाहीन, निष्काळजी आणि मुर्दाड झाली असल्याचेही आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
तर डोंबिवली कल्याणकर नागरिकांचा अंत पाहू नका आणि लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करा नाहीतर हेच रस्त्यावर पडलेले सुटे दगड नागरिकांच्या हातात असतील आणि ते एक दिवस महापालिकेच्या दिशेने भिरकावले जातील, पालिकेच्या नाकर्तेपणामुळे तो दिवसही दूर नसल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा