Home ठळक बातम्या …म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत आल्यावर म्हटले ‘ मी पुन्हा येईन...

…म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत आल्यावर म्हटले ‘ मी पुन्हा येईन ‘

दिपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या दहीहंडीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बोटीने प्रवास

डोंबिवली दि. २० ऑगस्ट :
मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर आपण पहिल्यांदाच डोंबिवलीतील आलेलो आहोत. लवकरच मी पुन्हा येईन आणि कल्याण डोंबिवलीचे जे काही प्रश्न आहेत ते आपण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सोडवू असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत केले. डोंबिवली पश्चिमेला दिपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवासाठी त्यांनी शुक्रवारी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर पावसात माणकोली ते मोठा गाव,डोंबिवली असा बोटीतून प्रवास केला. यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यासाठी ‘ मी पुन्हा येईन ‘ असे स्पष्ट केले.

डीजेचा आवाज आधी कमी करा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दहीहंडीच्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी डीजेचा एकदम कमी करा, फक्त गोविंदांना आणि उपस्थित लोकांना ऐकू येईल इतकाच आवाज ठेवा, आपल्याला नियम पाळायचे आहेत असे सांगत त्यांनी भाषणाला सुरूवात केली.

गणेशोत्सव- नवरात्रौत्सवही इतक्याच उत्साहात…

यंदा दोन वर्षानंतर साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवात गोविंदांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हे सर्वसामान्यांचे सरकार असून सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेणार. आपली संस्कृती परंपरा जोपासण्यासाठी सरकार प्रयत्न करतेय, अवघ्या दिड महिन्यात तब्बल सातशे निर्णय आम्ही घेतले आहेत. तर दहीहंडी उत्साहात साजरी झाला आता गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवही तितक्याच उत्साहात साजरा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत…
मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच डोंबिवलीत आले होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. माजी महापौर पुंडलिक म्हात्रे आणि माजी नगरसेवक तथा महोत्सवाचे आयोजक दिपेश म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ आणि शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच गोविंदा पथकांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले.

तूमच्यातीलच एक मुख्यमंत्रीपदी विराजमान…
दोन वर्षानंतर दहीहंडी उत्सव साजरा होतोय, सरकारनेही पूर्णपणे मोकळीक दिली असून अत्यंत उत्साहात हा सण साजरा होतोय याचं मला समाधान वाटतंय ,आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर हे सरकार तुमचे आमचे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. हे शिवसेना भाजपा युतीचं सरकार असून प्रत्येकाला वाटते हे माझं सरकार आहे. हा फरक गोविंदा उत्सवांमध्ये पाहायला अनुभवायला मिळतोय ही चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले. मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात, कारण आज तुमच्यातलाच एकनाथ शिंदे येथे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्याचे ते म्हणाले.

आम्ही पण दीड महिन्यापूर्वी 50 जणांची हंडी फोडली…
गोविंदांना उद्देशून बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की तुम्ही खूप हंड्या फोडल्या. दिड महिन्यापूर्वी आम्ही पण 50 जणांची हंडी फोडली, त्यात मुंबई सुरत गुवाहाटी असा प्रवास असल्याची मिश्किल टिप्पणीही करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तर सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार स्थापन झालं आहे, गोविंदासाठी निर्णय घेतलेत. लोकांचं सरकार असून लोकांना जे पाहिजे ते देण्याचे काम हे सरकार करणार आहे. म्हणून तुम्हाला जे हवंय, या जनतेला जे पाहिजे ते जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्याचं काम एक-दीड महिन्यांमध्ये आम्ही करतोय. जे मागच्या अडीच वर्षात झालं नाही ते दीड महिन्यांमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला असून तब्बल सातशे निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

गणेशोत्सव – नवरात्रौत्सवही धूम धडाक्यात
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परवानग्या एकाच ठिकाणी देण्याचा निर्णय घेत मंडप शुल्कही माफ केले. हे सगळे निर्णय लोक हितासाठी आणि आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्यासाठी घेतले आहेत. दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केलाच आहे पण गणेशोत्सव नवरात्रोत्सव देखील मोठ्या धुमधडाका साजरा करण्यात येईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बोट चांगली होती सुरक्षित पोहचलो…
दरम्यान रात्री साडे अकरा वाजता भर पावसात बोटीने केलेल्या प्रवासाबाबत त्यांना विचारले असता मिश्किल स्वरात ते म्हणाले की बोट चांगली होती, सुरक्षितपणे आलो आहे. तसेच आपण याठिकाणी यावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता, या आग्रहापुढे शेवटी नेत्याला देखील यावच लागतं असे सांगत त्यांनी भर पावसातील बोट प्रवासाचे वर्णन केले.

सगळीकडेच दही हंडींचा उत्साह – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…

यावर्षी जल्लोषात – उत्साहात गोविंदा पथकं बाहेर पडलेले आहेत. गेली दोन वर्षे कोविडमुळे सर्व उत्सव सणांवर मर्यादा होत्या. मात्र यावर्षी मात्र सर्व गोविंदाने सगळी कसर भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. मुंबई ठाणे कल्याण भिवंडी सगळीकडे सगळ्या शहरांमध्ये राज्यभरात मोठा उत्साह दिसून आल्याची प्रतिक्रिया कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आपली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचं काम हे सगळे लोक करत असून शिवसेना भाजपाचे युती सरकारने दहीहंडीसह गणेशोत्सव साजरा करण्याबाबतही खूप लवचिक धोरण स्वीकारलं असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनीही दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या दही हंडी उत्सवासाठी माणकोली वेल्हे गाव ते डोंबिवली मोठा गाव गणेश घाट येथे बोटीने प्रवास केला.

 

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा