Home ठळक बातम्या कोवीडनंतर बिघडलेले विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन राखण्यासाठी योगासनांचा उपाय

कोवीडनंतर बिघडलेले विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन राखण्यासाठी योगासनांचा उपाय

कल्याणातील मराठी शाळेचा स्तुत्य उपक्रम

कल्याण दि.11 नोव्हेंबर :
कोवीड काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वाधिक मानसिक परिणाम कोणावर झाला असेल तर ती लहान मुले. दिवस रात्र सतत घरामध्ये आणि तेही बहुतांश काळ लॅपटॉप, टिव्ही आणि मोबाईलच्या सानिध्यात. त्यामुळे शारीरिक आरोग्यासह त्यांचे मानसिक संतुलनही बिघडले. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या शारदा मंदिर शाळेमध्ये ईनरव्हील क्लबच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोवीड काळ अत्यंत आव्हानात्मक…

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांसाठी कोवीड काळ अत्यंत आव्हानात्मक होता. प्रत्येकाच्या केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्याचाही त्यामध्ये कस लागला. आपल्यातील ज्येष्ठ म्हणजेच 60 वर्षांहून अधिक वयाच्या पिढीने याआधी अनेक भीषण नैसर्गिक आपत्ती, संकटं पाहिली आहेत. मात्र आपल्यातील 40 आणि त्याआतील वयाची पिढी अशी आहे की जिने तिच्या जन्मापासून पहिल्यांदाच एवढा प्रचंड तणावाला तोंड दिले. कोविड काळात जेवढा तणाव त्यांनी अनुभवला त्यासाठी कोणतीही मानसिक किंवा शारीरिक तयारी नव्हती. जर या पिढीची ही अवस्था होती तर त्यांच्या मुला मुलींची मानसिक अवस्था कशी झाली असेल? याचा विचार करूनच अंगावर काटा येतो.

शारदा विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योगासनांचा उपक्रम…

कोवीडने आपल्याला भरपूर गोष्टी शिकवल्या. त्यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट होती ती आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य. या दोन्ही गोष्टी उत्तम असतील तर कितीही मोठे संकट किंवा समस्या आल्यास आपण त्यांना सहजपणे तोंड देऊ शकतो. नेमका हाच धागा पकडून कल्याणातील इनरव्हील क्लब आणि ईनरव्हील क्लब रिव्हरसाईड या सामाजिक संस्थांनी शारदा विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योगासनांचा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांनी दिली. तसेच या दोन्ही सामाजिक संस्थांतर्फे येत्या काळात विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठीही आरोग्य शिबीर राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा