
भिवंडी लोकसभेमध्ये 1 वर्षात विकासाला ब्रेक लागल्याचा आरोप
भिवंडी, दि. 30 जून :
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा वर्षभरात भ्रमनिरास झाला असून खासदारांची पत्रकार परिषद म्हणजे `खोदा पहाड, निकला चुहा’ अशी होती. एक वर्ष झालं आहे ना मग आधी प्रोसीजर शिका आणि मग बोला अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिले. (First learn the procedure and then speak; their press conference is like “Khoda Pahad Nikla Chuha” – Former Union Minister of State Kapil Patil’s criticism)
खासदार म्हणून निवडून येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. म्हात्रे यांच्या या टीकेला आणि आरोपांना उत्तर देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनीही मग “भिवंडी लोकसभेमध्ये विकासाला 1 वर्षे ब्रेक” या ब्रीदवाक्याखाली पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाटील यांनी खासदारकीच्या १० वर्षांच्या कारकिर्दीतील विकासकामांची यादी सादर करीत पद असो वा नसो मतदारसंघातील जनतेशी आपली नाळ कायम असल्याचे यावेळी सांगितले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात १० वर्षात खासदार म्हणून काम करताना पत्र दिल्यानंतर ते काम होईल, यासाठी झटत होतो. त्यातून ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो,आठ पदरी ठाणे-भिवंडी बायपास, कल्याण-मुरबाड रेल्वे अशी असंख्य छोटी-मोठी कामे मंजूर करून घेतली होती. मात्र, गेल्या वर्षभरात भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. याबाबत सोशल मिडियातून नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. कोणतीही कामे पत्र देऊन होत नाहीत. त्या प्रकल्पाची व्यवहार्यता लक्षात घेऊन प्रकल्प आराखडा तयार करावा लागतो. त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करीत आपण ठाणे-भिवंडी मेट्रो, मुरबाड रेल्वे प्रकल्प मंजूर केला. वडपे ते नाशिक हा सहा पदरी महामार्ग करण्याची मागणी केली होती. या कामालाही नाशिकच्या बाजूने सुरूवात झाली आहे, असे कपिल पाटील यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
खासदार झाल्यानंतर बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडून सातत्याने कपिल पाटील यांच्यावर आरोप केले जात आहेत. याबाबत कपिल पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, “ते ज्या ठिकाणी उभे राहून माझ्यावर आरोप करीत असतात. ते काम मी मंजूर केलेले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेच्या काळात आपण खासदार असतानाही, दुर्गाडी – मोठागाव येथील पुलाचे काम मंजूर केले होते. त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी खासदार आनंद परांजपे यांचेही योगदान होते अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. तर तुम्हाला आता एक वर्ष झाले आहे, आधी प्रोसीजर माहिती करून घ्या आणि मग बोला. नुसते व्हिडिओ टाकायचे आणि शाबासकी मिळवायची यातून विकासकामे होत नसल्याचा टोलाही कपिल पाटील यांनी लगावला.
कपिल पाटील यांचा `लाव रे तो’ व्हीडीओ!
टोरंट पॉवर, कल्याण-मुरबाड रेल्वे आदी प्रश्नांबाबत जनतेची दिशाभूल करण्याची वक्तव्ये केली. खासदार म्हणून निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशी टोरंट हटविणार, असे वक्तव्य केले. त्यातून मते मिळविली. मुरबाड रेल्वेची घोषणा खोटी असल्याचे सांगून गाजरे वाटली. मात्र, आता लोकसभेत २०२३ मध्ये मुरबाड रेल्वे मंजूर झाली असल्याचे म्हटले, याकडे लक्ष वेधत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्याशी संबंधित काही व्हिडिओही दाखवले. ज्यातून विद्यमान खासदारांचा दुटप्पीपणा सिद्ध होत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.