
योग्य नियोजन, स्वच्छतेच्या यंत्रणा आणि मनुष्यबळ यांचा उत्तम समन्वय
कल्याण दि.25 मे :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ५/ड प्रभागात आयटॅक म्हणजेच ‘इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग” (ITAC) ही विशेष स्वच्छता मोहीम चांगलीच यशस्वी ठरली आहे. या मोहिमेंतर्गत कल्याण पूर्वेच्या आत्माराम नगर परिसर, कमलादेवी महाविद्यालय मागील भाग, साईबाबा मंदिर गुजराती चाळ, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानासमोरील परिसर आणि मंगेशी संस्कार परिसरातून अवघ्या 2 दिवसांत तब्बल ३३५ टन कचरा उचलण्यात आला आहे. (ITAC campaign in KDMC’s “D” ward; 335 tons of waste collected in just two days)
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छतेचा विडा उचललेल्या सुमित एल्कोप्लास्ट या घनकचरा व्यवस्थापन एजन्सीमार्फत ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
केडीएमसी प्रशासनाकडून अवघ्या आठवड्याभरापूर्वी एका शानदार कार्यक्रमाद्वारे 7 वेगवेगळ्या प्रभागातील शहर स्वच्छता उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. चेन्नई शहरात गेल्या चार वर्षांपासून यशस्वीपणे कचरा संकलन, वाहतूक आणि शहर स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतही अशाच प्रकारे काम केले जात आहे. त्याचा पहिला भाग म्हणून येथील ड प्रभागातील आत्माराम नगर परिसर, कमलादेवी महाविद्यालय मागील भाग, साईबाबा मंदिर गुजराती चाळ, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानासमोरील परिसर आणि मंगेशी संस्कार परिसरात रात्रीच्या वेळी ही आयटॅक मोहीम राबविण्यात आली.
रात्रपाळीतील कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी योग्य नियोजन, स्वच्छतेच्या यंत्रणा आणि मनुष्यबळ यांचा उत्तम समन्वय यावेळी दिसून आला. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रभाग क्षेत्र ५/ड चे सहायक आयुक्त उमेश यमगर, सुमित एल्कोप्लास्टचे सानु वर्गीस, प्रविण भोईर, युनिट ऑफिसर विकास सोनवणे सुपरवायझर आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही मोहीम वेळेत आणि गुणवत्तेने पार पडली.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून, स्थानिक रहिवाशांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. नागरिकांना करण्यात आलेल्या आवाहनानुसार त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर झाल्याची माहिती ड प्रभागाचे सहा.आयुक्त उमेश यमगर यांनी दिली आहे.
तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ही स्वच्छ भारत अभियानाच्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने कार्यरत आहे. केवळ साफसफाई न करता, नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करून शहर स्वच्छतेचा आदर्श उभा करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी, कचरा वेळेवर आणि योग्य पद्धतीने देऊन या उपक्रमाला सहकार्य करावे. जेणेकरून स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यपूर्ण कल्याण- डोंबिवलीच्या निर्मितीत हातभार लागेल असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.