Home ठळक बातम्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक प्रकल्पांना गती द्या – खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची...

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक प्रकल्पांना गती द्या – खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची एमएमआरडीएला सूचना

महत्वाच्या प्रकल्पांच्या निविदाही लवकरच जाहीर होणार

कल्याण दि.5 सप्टेंबर :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात सुरू असलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

या बैठकीत एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, तसेच ठाणे व कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त, लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या चर्चेतील ठळक मुद्दे…

अंबरनाथ सॅटिस प्रकल्प :
सुमारे ८० कोटी रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी आवश्यक जागेच्या प्रश्नावर चर्चा झाली. लवकरच जागेचा तिढा सोडवून कामाला गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

कल्याण रिंग रोड :
डोंबिवली–टिटवाळा अंतर कमी करण्यासाठी महत्वाचा असलेल्या या रस्त्याच्या आठ टप्प्यांपैकी टप्पा ४, ५, ६ व ७ चे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. टप्पा ३ चे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण होणार आहे. टप्पा १ व २ साठी भूसंपादन व नव्याने आरेखन सुरू असल्याने या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

शिळफाटा–रांजनोली द्विस्तरिय रस्ता :
शिळफाटा ते रांजनोली या मार्गावर डबल डेकर उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. या महत्त्वाच्या मार्गासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी, असे निर्देश खासदारांनी यावेळी दिले. यामुळे हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे.

मेट्रो प्रकल्प :
ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रो ५ आता बदलापूर- अंबरनाथ दरम्यानच्या चिखलोली स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या परिसरातील नागरिकांना ठाणे, मुंबई व नवी मुंबई गाठणे सोपे होणार आहे. हा मार्ग उल्हासनगर आणि अंबरनाथवासियांसाठी महत्वाकांक्षी ठरणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प :

अंबरनाथ–बदलापूर–उल्हासनगर या संयुक्त प्रकल्पाच्या उभारणीचा आढावा घेण्यात आला. तिन्ही पालिकांनी समन्वय साधून हे काम वेगाने पूर्ण करावे, असे निर्देश देण्यात आले.

डोंबिवली सॅटिस प्रकल्प :
डोंबिवली स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येथे सॅटिस उभारणीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या. हा प्रकल्प डोंबिवली स्थानकातील कोंडी फोडण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.

इतर प्रकल्प : यू-टाईप रस्ता व इतर महत्वाच्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला.

या बैठकीला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, तसेच शिवसेना पदाधिकारी राजेंद्र चौधरी, अरुण आशान, राजेश कदम, रवी पाटील, रमाकांत देवळेकर, निलेश शिंदे, रमाकांत मढवी, बाबाजी पाटील, महेश गायकवाड, पप्पू पिंगळे, मिलिंद पाटील, राजन मराठे, नितीन पाटील, सागर जेधे, कुणाल भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा