
कल्याण दि.17 मार्च :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणावळा येथील कार्ला गडावर आई एकविरा देवीच्या चैत्र पालखी सोहळ्याची तयारी उत्साहात सुरू आहे. यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्याचा हा मान ठाणे जिल्ह्यातून कल्याणच्या कोळीवाड्याला मिळाल्याने परिसरातील आगरी कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Chaitra Palakhi Sohla: This Year, the Honor of Ekvira Devi’s Palanquin Ceremony Goes to Kalyan Koliwada from Thane District)
दरवर्षी चैत्र महिन्यातील सप्तमीला आई एकविरा देवीचा भव्य असा पालखी सोहळा निघतो. ज्यामध्ये महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्तिभावूर्ण वातावरणात सहभागी होतात. तर एकविरा देवीची पालखी आणि या पालखी सोहळ्याचा मान मिळण्याला आगरी कोळी समाजामध्ये मोठे महत्व आहे. यंदा एकविरा देवीचा हा पालखी सोहळा 25 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता होणार असून त्याचा मान कल्याण कोळीवाड्याला मिळाल्याने कल्याणच्या आगरी कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कल्याण कोळीवाड्याकडून आई एकवीरा देवीच्या डोंगरावरती ही मिरवणूक निघणार आहे. आई एकविरा देवीच्या चार मानाच्या पालख्या असतात आणि ठाणे जिल्ह्यातून एकमेव कल्याण कोळीवाड्याला पालखीचा मान मिळतो.
कल्याणच्या कोळी -आगरी समाजाचे ऐतिहासिक महत्त्व…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या कल्याण शहराचा उल्लेख प्राचीन काळापासून आढळतो. स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५७ साली कल्याण बंदरातून केली होती. दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदराची निर्मिती स्थानिक कोळी-आगरी समाजाच्या सहकार्याने झाल्याची ऐतिहासिक नोंद आहे.
कल्याण कोळीवाडा हा दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेला असून या कोळी-आगरी समाजाची कुलदेवता आई एकवीरा माऊली ही रेणुका मातेचा अवतार मानली जाते. दरवर्षी चैत्र महिन्यातील चैत्र सप्तमीला आई एकवीरा माऊलीचा भव्य पालखी सोहळा पार पडतो. अनेक वर्षांपासून कल्याण कोळीवाड्यातील कोळी बांधवांना या पालखी सोहळ्याचा मान मिळत असून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यासाठी कल्याणच्या कोळीवाड्यातील कोळीबांधव सज्ज झाले आहेत.


























