
कल्याण दि.8 फेब्रुवारी :
कल्याण शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर घालत ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन आज कल्याणात करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि जी.एस. मेडिकल कॉलेजच्या डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक रुग्णालयाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. (Largest Maternity Hospital in Thane District Inaugurated in Kalyan)
कल्याणातील सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. अश्विन कक्कर यांच्या पुढाकारातून कल्याण पश्चिम येथील मुरबाड रोड परिसरातील सिंडिकेट भागात हे ( जुन्या रुग्णालयापासून काही अंतरावर) सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे. तळ मजला अधिक सात मजले अशा भव्य इमारतीमध्ये तब्बल ४८ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हे रुग्णालय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलपैकी एक ठरले आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेला शस्त्रक्रिया कक्ष, लेबर कक्षासह नवजात अर्भकांना बाहेरून येणाऱ्या लोकांकडून कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी या रुग्णालयात घेण्यात आली आहे.
डॉ. अश्विन कक्कर यांना २३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या जुन्या रुग्णालयात ४३ हजारांहून अधिक महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी सुमारे ७० टक्के प्रसूती नैसर्गिक पद्धतीने झाल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना डॉ. कक्कर म्हणाले की, या नव्या रुग्णालयासाठी आपल्याला कोविड काळात केडीएमसीचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रेरणा दिली. तर तत्कालीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी जागेच्या अडचणी दूर केल्या आणि विद्यमान आयुक्त अभिनव गोयल यांनी आवश्यक त्या शासकीय परवानग्या वेळेत उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे विक्रमी २६ महिन्यांत ही भव्य इमारत उभी राहू शकल्याचेही ते म्हणाले. या नव्या रुग्णालयामुळे परिसरातील महिलांना आधुनिक आणि आणखी सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

























इतके मोठे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रसूती गृह कल्याण शहरात निर्मित केल्याच्या वृत्ताबद्दल धन्यवाद. पण अशा प्रकारचे वृत्त देताना गरजू जनतेला याचा लाभ घेण्यासाठी आपण किंवा आपल्या पत्रकाराने सदरच्या वृत्तात या प्रसूती ग्रहाचा कल्याण शहरातील पत्ता देणे अत्यंतिक गरजेचे होते. येथून पुढे अशा प्रकारचे वृत्त देताना आपल्या पत्रकारांकडून अशा त्रुटी राहू देऊ नका.
अनवधानाने बातमीमध्ये ही माहिती देणे राहून गेली असून आपल्या सूचनेचे तातडीने पालन करण्यात आले आहे सर..