
कल्याण दि.6 जून :
कल्याण पश्चिमेच्या रेल्वे स्टेशन परिसरातील विविध नागरी समस्यांनी दिवसागणिक उग्र रूप धारण केले असून या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या राणी दिलीप कपोते या गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. तसेच याच समस्यांविरुद्ध त्यांनी सुरू केलेल्या सह्यांच्या मोहिमेला सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (Social activist Rani Dilip Kapote has been on an indefinite hunger strike and signature campaign for 6 days against various problems in the Kalyan Station area.)
या उपोषणाची सुरुवात ३१ मे रोजीच्या राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी दिनी अभिवादन करून करण्यात आली. कल्याण स्टेशन परिसरात सुरू असलेले अनैतिक धंदे, वेश्या व्यवसाय, अंमली पदार्थांची विक्री – सेवन तसेच मटका,सट्टा ,जुगार, वाढती गुन्हेगारी, अस्वच्छता, वाहतूक कोंडी, गर्दी, फेरीवाले, केडीएमसी कै. दिलीप कपोते वाहनतळ येथील काही तांत्रिक विषय, स्वच्छता, प्रदूषण, लोकांची बेशिस्त , धीम्या गतीने चालणारी विकासकामे, रेल्वे स्टेशन परिसरात महिलांना होणारा त्रास आदी गंभीर मुद्द्यांवर आपण हे आंदोलन सुरू केल्याची माहिती कपोते यांनी दिली.
तसेच या प्रश्नांसोबतच कै.दिलीप कपोते वाहनतळ, कल्याण तहसील आणि कल्याण कोर्टसमोर साठणारे पाणी, अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेली विकासकामे तसेच कल्याण रेल्वे स्टेशन येथील विकासकामे आणि प्लॅटफॉर्मवर बांधकाम, लाद्या बसवणे, स्वच्छता, पत्र्याचे तुटलेले शेड, दुर्गंधी, रेल्वे रुळांवरील अस्वच्छता हे प्रश्नही तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तर यासोबतच केडीएमसीच्या स्काय वॉकवर आणि रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर १००फुटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलीस कंट्रोल रूम आणि ट्रॅफिक विभाग तसेच पारदर्शकतेसाठी चौकाचौकात मोठ्या स्क्रीनवर चित्रीकरण दाखवावे जेणेकरुन सर्व प्रशासकीय बाबी चोख राहून नागरिकांनाही प्रशासनावर विश्वास निर्माण होईल असेही कपोते यांनी सांगितले.
तर दुर्गाडी चौकापासून ते खडकपाडापर्यंत रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या मोठ्या बसेस, त्यामुळे होणारी दुर्गंधी, वेश्या व्यवसाय, अस्वच्छता पसरली आहे. या सर्व बसेस तिथे पार्क न करता दुर्गाडी येथील सीएनजी पेट्रोल पंप येथे पार्क करण्यात याव्यात, कल्याणबाहेरील बसेसना केडीएमसी रस्त्यावर पार्किंगची परवानगी नाकारावी अशा सर्वच नागरी आणि सामाजिक प्रश्नांसाठी आपण हे बेमुदत उपोषण सुरू केल्याची माहिती राणी दिलीप कपोते यांनी दिली आहे.