
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सहभाग
नवी दिल्ली दि.२९ जुलै :
काँग्रेस सरकारच्या काळात देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले. यात शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेले. मात्र काँग्रेसचे मंत्री भाषणबाजी करण्यात मग्न होते. काँग्रेसचे महाराष्ट्रतील तत्कालीन मुख्यमंत्री बॉलिबुडमधील लोकांना घेऊन हॉटेल ताजमध्ये गेले, दहशतवादाशी लढण्यास काँग्रेस सपशेल अपयशी ठरली, असा हल्लाबोल शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत केला. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत खासदार डॉ. शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका सभागृहात मांडली. देशाच्या सुरक्षेबाबत शिवसेना कोणतीही तडजोड करणार नाही, असे खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांना ठणकावले. (The current central government has given a strong response to terrorism, Congress has completely failed in fighting terrorism – MP. Dr. Shrikant Shinde)
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मुंबईवर २६/११ वेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून अद्याप देश सावरलेला नाही. इतका मोठा हल्ला झाला ज्यात शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेले. याबाबत संवदेना न दाखवता महाराष्ट्राचे तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री बॉलिवुडच्या कलाकारांना घेऊन ताज हॉटेलमध्ये गेले होते, हा संपूर्ण देशासाठी लाज आणणारा क्षण होता, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. दहशतवाद रोखण्यास काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली. मात्र आज देश एका मजबूत नेतृत्वाच्या हातात आहे. त्यामुळेच मागील १० वर्षात महाराष्ट्रात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यातील पिडितांना न्याय देण्याचे काम केले. केंद्र सरकार दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहे. पहलगाम हल्ल्यात कल्याण मतदार संघातील तीन निर्दोश नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबियांना आज न्याय मिळाला, मात्र २००६ मध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या १२७ नागरिकांचे कुटुंबिय आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, कारण या हल्ल्यातील आरोपी निर्दोष सुटले. काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे पिडित कुटुंबियांना न्याय मिळाला नाही, अशी घणाघाती टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीने उबाठा पक्षाच्या एका उमेदवाराचा प्रचार केला होता, ते कुठल्या तोंडाने सरकारला जाब विचारतात, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठा गटावर केली.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, भाजप सरकारने लागू केलेला पोटा कायदा काँग्रेसने रद्द केला. हा कायदा रद्द् झाल्यानंतर देशात दहशतवादी हल्ले वाढले. भोपाळ गॅस दुर्घटनेतील मुख्य आरोपीला परदेशी पलायन करण्यास काँग्रेस सरकारनेच मदत केली. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुबाबत काँग्रेसला सहानुभूती होती, मात्र प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाले तेव्हा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुखर्जींकडे मागणी केल्यानंतर अफजल गुरुला फाशी देण्यात आली. मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ताज हॉटेलमध्ये बॉलिवुड कलाकारांना घेऊन गेले. तसेच तत्कालीन गृहमंत्र्यांनी मोठ्या शहरात अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री दिवसाला तीन तीनवेळा कपडे बदलण्यात मग्न होते, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली.