Home ठळक बातम्या पलावा पुलाचे अर्धवट काम; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे एकत्र येत...

पलावा पुलाचे अर्धवट काम; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे एकत्र येत सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन

दोन्ही पक्ष एकत्र येण्यावरून राजू पाटील आणि दिपेश म्हात्रे यांचा सकारात्मक प्रतिसाद 

कल्याण ग्रामीण दि.31 मे :
राज्याच्या राजकारणात एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे एकत्र येणार असल्याचे जोरदार वारे वाहताना दिसत आहेत. अशातच आज कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रितपणे आंदोलन केल्याचे दिसून आले. कल्याण शीळ मार्गावरील बहुचर्चित पलावा उड्डाणपुलाच्या कामावरून मनसे नेते राजू पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले.

वाहतुकीच्या बाबतीत अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कल्याण शीळ मार्गाावर पलावा जंक्शन येथे दोन्ही बाजूला उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु आहे. मात्र या पुलाच्या या अर्धवट कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्रॅफिक कोंडीमुळे परिसरातील शाळेलाही सुट्टी देण्याची वेळ आल्याची आठवण शिवसेना आणि मनसेने आपल्या आंदोलनावेळी करून दिली.

इथल्या नागरिकांना सत्ताधारी पक्षाकडून पुलाच्या उद्घाटनाबाबत यापूर्वी अनेक वेळा खोट्या तारखा सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांनी केला. तसेच 31 मे रोजी हा पूल वाहतुकीसाठी सुरू होईल हे आश्वासनही अपूर्ण राहिले आहे. नागरिकांची ही गंभीर फसवणूक लक्षात घेता नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आल्याची प्रतिक्रिया म्हात्रे यांनी दिली.

तर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आले तर आपल्याला एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच आनंद होईल. मात्र याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे सांगत दिपेश म्हात्रे यांनी दोन्ही पक्षाच्या एकत्र येण्यावरून यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला.

तर एकंदर परिस्थिती पाहता येत्या महापालिका निवडणुकीपूर्वी हा उड्डाणपूल सुरू होईल असे दिसत आहे. मात्र हा पूल वाहतुकीला सुरू झाला तरी नागरिकांना अजिबात दिलासा मिळणार नाही अशा शब्दांत मनसे नेते राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच दुसऱ्या बाजूच्या पुलाचे काय? याठिकाणी असणाऱ्या अनधिकृत बांधकामांचे काय? उर्वरित जागेतील भूसंपादनाचे काय? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहणार असल्याने नागरिकांना त्यातून दिलासा मिळण्याचे चित्र अजिबात दिसत नसल्याची संतप्त प्रतिक्रियाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

तर मनसे असो की शिवसेना आम्ही दोन्ही पक्ष हे राज्यातील मराठी माणूस आणि त्या मराठी माणसाच्या मनाशी जोडलेले असून आमच्याकडून मराठी माणसाला एक आशाही आहे. जर स्थानिक पातळीवर सर्व गोष्टी जुळून आल्या तर आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही एकत्रही येऊ शकतो असे सांगत मनसे नेते राजू पाटील यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्यावरून सकारात्मक भूमिका स्पष्ट केली.

ही लढाई कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून, सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठीची आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना – हे दोन्ही पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र लढण्यास कटिबद्ध आहोत असे या दोघांनीही यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान काही वर्षांपूर्वी राजू पाटील आणि दिपेश म्हात्रे यांच्यामधील राजकीय वाद आणि शाब्दिक युद्ध किती टोकाला पोहोचले होते हे सर्वानाचठाऊक आहे. मात्र ते सर्व राजकीय वाद बाजूला ठेऊन आज दोन्ही नेते एकत्र आल्याने, “राजकरणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो” या विचारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा