
नव्या कंत्राटदाराकडून मनमानी सुरू असल्याचा मनसेचा आरोप
कल्याण दि. 25 जून :
केडीएमसीच्या 600 कंत्राटी सफाई कामगारांना बेकायदेशीरपणे काढल्याचा आरोप करत मनसेने आज पुन्हा एकदा केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. तसेच केडीएमसीच्या 7 प्रभागांसाठी नव्याने दाखल झालेला कंत्राटदार मनमानीपणे कारभार करत असल्याचा आरोपही यावेळी मनसेकडून करण्यात आला.(KDMC lays off 600 contractual sanitation workers; MNS marches against KDMC)
केडीएमसीच्या घनकचरा विभागामध्ये सेक्युअर 1कंपनीच्या 600 कंत्राटी सफाई कामगारांना अचानक घरी बसवण्यात आले आहे. या कामगारांनी कोवीडच्या कठीण काळातही महापालिकेला सेवा देत शहर स्वच्छ ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती असे मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशानुसार या जुन्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करणे आवश्यक होते. मात्र केडीएमसीने 7 प्रभागांमधील स्वच्छतेचे काम दिलेल्या सुमित कंपनीकडून त्याविरोधात मनमानी पद्धतीने कामगार भरती सुरू असल्याचा आरोपही यावेळी उल्हास भोईर यांनी केला आहे. तसेच या 200 सफाई कर्मचाऱ्यांना केडीएमसी आणि संबंधित कंपनीने तातडीने कामावर रुजू करून घेण्याची आग्रही मागणीही भोईर यांनी यावेळी केली.
दरम्यान या कामगारांना कामावर घेण्यासंदर्भात मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले आहे. यावेळी मनसेचे रोहन अक्केवार, गणेश लांडगे, कपिल पवार यांच्यासह अनेक पदाधिकरी उपस्थित होते.
यासंदर्भात केडीएमसी चे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी या कामगारांसंदर्भात माणुसकीच्या भावनेतून निर्णय घेतला जाईल असे सांगितले. तसेच सिक्युअर वन कंपनीच्या किती कामगारांना सुमित कडे समाविष्ट करण्यात आले आहे याबाबतही माहिती मागविण्यात आली आहे. जेणेकरून या कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही अशी महापालिकेची भूमिका आहे.