Home ठळक बातम्या क्या बात है : थर्टीफर्स्टचे सेलिब्रेशन टाळत ‘गरिबांच्या पाठीवर मायेची ऊब’

क्या बात है : थर्टीफर्स्टचे सेलिब्रेशन टाळत ‘गरिबांच्या पाठीवर मायेची ऊब’

 

कल्याण दि.1 जानेवारी :
थर्टीफर्स्ट म्हणजेच 31 डिसेंबर म्हणजे जुने वर्षाचा शेवटचा दिवस. वर्षाचा हा शेवटचा दिवस अनेक जण आपापल्या पध्दतीने साजरा करतात. मग काही जण आपल्या मित्र मंडळींसोबत जंगी पार्टीद्वारे सेलिब्रेशनचे बेत आखातात तर काही जण पर्यटन स्थळी जाऊन आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवतात. पण कल्याणातील काही संवेदनशील तरुणांनी साजरा केलेला थर्टीफर्स्ट मात्र काहीसा हटके आणि इतरांसाठी प्रेरणादायी असाच ठरला. थर्टीफर्स्टच्या जंगी सेलिब्रेशनला फाटा देत त्याच खर्चातून गोर गरिबांच्या पाठीवर मायेची ऊब देण्यात आली.
‘Humanity is still alive (‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’) ग्रुपतर्फे या वाक्याला प्रमाण मानत कल्याणातील तेजस सांगळे या युवकाने आणि त्याच्या मित्रांनी आपल्या कृतीतूनही सिद्ध केले. सध्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडेही थंडी आणि गारवा जाणवत आहे. अशा गारव्यात फुटपाथ किंवा झोपडपट्टीत राहणारे अनेक जण कुडकुडत दिवस काढत आहे. नेमका हाच धागा पकडून तेजस आणि त्याच्या मित्रांनी एकत्र येत जमा केलेल्या पैशांतून या गोर गरिबांना ब्लॅंकेट वाटप केले. कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड, पत्रीपुल आणि बाजूचा परिसर,आधारवाडी झोपडपट्टी आदी 7 ते 8 ठिकाणी गरजू व्यक्तींना हे ब्लॅंकेट वाटप केल्याचे तेजसने सांगितले.

या स्तुत्य सामाजिक उपक्रमासाठी मुकुल सोनटक्के, शुभम शुक्ल, सुधीर शेट्टी, अमृता मोतीवाले यांच्यासह अनेकांनी आपला हातभार लावला. तर स्थानिक पोलिसांनीही या उपक्रमासाठी सहकार्य केले.

दरम्यान तेजस आणि त्याच्या मित्रांनी या सामाजिक उपक्रमातून दिलेला ‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’चा संदेश आपण सर्वांनीही आत्मसात करण्याची गरज आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा