Home ठळक बातम्या कोकणच्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण पुन्हा हाऊसफुल्ल, विशेष गाड्या सोडण्याची मनसे आमदार राजू...

कोकणच्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण पुन्हा हाऊसफुल्ल, विशेष गाड्या सोडण्याची मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

आमदार राजू पाटील यांनी रेल्वे व्यवस्थापन प्रशासनाला लिहिले पत्र

कल्याण ग्रामीण दि.10 मे :
गौरी गणपतीसाठी मुंबईसह उपनगरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. मात्र यंदाही एकाही रेल्वेगाडीचे तिकीट उपलब्ध होत नसल्याने कोकणसाठी विशेष आरक्षित आणि अनारक्षित गाड्या सोडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे. तसेच तिकिटांच्या काळ्या बाजारावरूनही आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला लक्ष्य केले आहे.

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गाड्यांची तिकिटं फुल्ल झाली आहेत. त्यामुळे सध्या कोकणवासीयांसमोर गावी जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली असून याबाबतच्या व्यथा मनसे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे मांडल्या आहेत.

राजू पाटील यांनी काय म्हटले आहे पत्रात…
दरवर्षी प्रमाणे गौरी गणपती दरम्यान सर्व गाड्या फुल्ल झाल्या आहेत. गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळावं म्हणून कोकणी बांधव रात्रभर रांगेत उभे असतात. परंतु रेल्वे आरक्षण पूर्णपणे दलालांच्या ताब्यात गेल्याने तिकीट मिळत नसल्याचा गंभीर आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रात केला आहे. तसेच रेल्वेकडून दलालांवर प्रत्यक्ष कारवाईऐवजी फार्सच केला जात असल्याने दलालांनी सर्व रेल्वे आरक्षणावर ताबा मिळवल्याचेही आमदार राजू पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे गौरी गणपती निमित्त आत्ताच नवीन विशेष गाड्यांचे नियोजन करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

तर छत्रपती शिवाजी महाराजटर्मिनस, दादर, दिवा, पनवेल, मुंबई सेंट्रल,वसई येथून सर्वाधिक आरक्षित आणि अनारक्षित गाड्या सोडून कोकणवासियांना दिलासा द्यावा असे मनसे आमदार राजू पाटील यांनी नमूद केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा