Home ठळक बातम्या विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्गादरम्यान नव्या उन्नत मार्गाची उभारणी; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे...

विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्गादरम्यान नव्या उन्नत मार्गाची उभारणी; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

नव्या उन्नत मार्गामुळे फुटणार कोंडी, कल्याणचीही कोंडी सुटणार

कल्याण दि.27 नोव्हेंबर :
कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी कल्याण किंवा उल्हासनगर शहराचा मोठा वळसा घालून जावे लागते. हा वळसा येत्या काही दिवसात थांबणार असून जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी उन्नत मार्गाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे ४० मिनिटांचा प्रवास वेळ पाच मिनिटांवर येणार आहे. लवकरच या कामाची निविदा जाहीर केली जाणार असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे.(construction-of-new-elevated-road-between-vitthalwadi-to-kalyan-nagar-highway-success-to-mp-dr-srikant-shindes-efforts)

एमएमआरडीएकडून तात्काळ मंजुरी आणि भूसंपादन सुरू…
कल्याण हे तालुक्याचे शहर असून अनेक शहरांना जोडणारे केंद्र आहे. अनेक महामार्ग या कल्याण शहराच्या शेजारून गेले आहेत. सध्याच्या घडीला कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातले प्रवासी वाहन चालक भिवंडी, ठाणे आणि मुंबईत जाण्यासाठी कल्याण शहरातून प्रवास करतात. त्यामुळे कल्याण शहराचे प्रवेशद्वार कोंडीत अडकते. यावर उपाय म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनापुढे जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून विठ्ठलवाडी ते थेट कल्याणच्या अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी उन्नत मार्गाची संकल्पना मांडली होती. एमएमआरडीएने तात्काळ त्याला मंजुरी देत त्याचे सर्वेक्षण करून भूसंपादन सुरू केले. त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाला असून त्यासाठी आवश्यक ७० टक्के जागाही संपादित करण्यात आली आहे.

प्रकल्पासाठी ७०० कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर…
आराखड्यानुसार विठ्ठलवाडी स्मशानभूमीच्या शेजारून हा उन्नत मार्ग सुरू होतो. कल्याण कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि पुढे कल्याण कसारा रेल्वे मार्ग ओलांडून वालधुनी नदीला समांतर असा हा उन्नत मार्ग थेट कल्याणच्या अहमदनगर महामार्गाला जोडला जाणार आहे. विठ्ठलवाडी येथील स्मशान भूमीजवळून हा मार्ग सुरू होऊन कल्याण अहमदनगर महामार्गावर पाम वॉटर रेसॉर्ट येथे उतरणार आहे. जवळपास अडीच किलोमीटरचा हा मार्ग कल्याण शहरात होणारी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी ७०० कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात जाणारी वाहतूक परस्पर वळवली जाणार आहे.

म्हणून हा उन्नत मार्ग ठरणार महत्वाचा…
सध्याच्या घडीला कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसर आणि कल्याण पश्चिम भागात येणारा हा परिसर तसा भौगोलिकदृष्ट्या दूर नाही. मात्र या वालधुनी, विठ्ठलवाडी परिसरातून प्रवास करत शहाड भागात जाणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी थेट मार्ग तर मुळीच नाही. त्यामुळे एकाच शहराची  दोन टोके दूर असल्यासारखे वाटतात. जुना कल्याण पुणे लिंक रस्ता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरातून शहाड परिसरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र आता ही कसरत बंद होणार आहे. विठ्ठलवाडी भागातून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी नव्या उड्डाणपुलाची निर्मिती केली जात आहे. कमीत कमी भूसंपादन करत अथडळे टाळत हा मार्ग उभारण्याची संकल्पना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. त्यामुळे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरून थेट कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरच्या पूर्व भागात पोहोचणे सोप होणार आहे. त्यामुळे कल्याण आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षात रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण क्रीडा अशा विविध सुविधांची उभारणी वेगाने झाल्याने येथे लोकसंख्याही झपाट्याने वाढते आहे. वाढत्या लोकसंख्येला रस्ते उड्डाणपूल आणि कोंडी मुक्त वाहतूक देण्याचा प्रयत्न कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्याअंतर्गत गेल्या काही वर्षात मेट्रो १२, ऐरोली काटई उन्नत मार्ग, माणकोली मोठागाव उड्डाणपूल, कल्याण रिंग रोड, शिळफाटा उड्डाणपूल, शिळफाटा रस्ता असे अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा