Home ठळक बातम्या डोंबिवलीच्या विकासाचे पालकमंत्री एकनाथ शिंदेच मारेकरी – आमदार रविंद्र चव्हाण यांचा गंभीर...

डोंबिवलीच्या विकासाचे पालकमंत्री एकनाथ शिंदेच मारेकरी – आमदार रविंद्र चव्हाण यांचा गंभीर आरोप

 

मुंबईतील पत्रकार परिषदेत आमदार रविंद्र चव्हाणांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका

मुंबई दि. 23 फेब्रुवारी :
एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीतील काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा स्पष्ट आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदेच असून तेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खबळजनक आरोप आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज केला. आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार टिकेच्या फैरी झाडल्या.

डोंबिवलीत दर्जेदार रस्ते व्हावेत म्हणून एमएमआरडीएच्या माध्यमातून कामं करण्याची संकल्पना आपण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर डोंबिवलीचा आमदार या नात्याने सर्वप्रथम मांडली. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मान्यता देत केडीएमसीपेक्षा एमएमआरडीए अधिक चांगल्याप्रकारे रस्ते बांधणी करेल असेही ठरल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

तसेच या कामासाठी मंजूर झालेल्या 470.82 कोटीच्या निधीतून डोंबिवलीतील 34 रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे निश्चित झाले. तसेच रस्त्यांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एमएमआरडीएने सुमारे 9 कोटी रुपये खर्च केल्याची माहितीही आमदार चव्हाण यांनी दिली.

तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना गेली 25 वर्षे सत्तेत आहे. आजपर्यंत महापालिकेच्या 5 सार्वत्रिक निवडणूका झाल्या. या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपा एकत्र किंवा विरोधात अशी राजकीय लढाई लढलो. मात्र भाजपाने शहर विकासाबाबत कायमच सकारात्मक भूमिका निभावली. उलट शिवसेनेनं स्थानिक पातळीवरील भाजपा कार्यकर्त्यांच्या, नगरसेवकांच्या कामाला कायम खोडा घातल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकांमध्ये युतीत इतके वर्ष लढूनही शिवसेनेचे ठाण्याचे नेतृत्व कल्याण डोंबिवलीच्या विकासकामामध्ये झारीतील शुक्राचार्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोपही आमदार चव्हाण यांनी केला.

तसेच भाजप नगरसेवकांच्या फायली महापालिकेत दाबून ठेवणे, आयुक्तांवर, प्राधिकरण प्रमुखांवर दबाव टाकून त्या निगेटिव्ह करणे, चांगल्या कंत्राटदारांना महापालिकेत येऊ न देणे असे प्रकार मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महापालिकांमध्ये सर्रास सुरु असून याविरोधात आम्ही आमच्या पातळीवर संघर्ष करतच असतो असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले. स्वार्थी हेतूने शहराच्या विकासात अडथळा टाकण्याचं काम गेल्या 20 वर्षापासून शिवसेना करत आहे. हे मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त करत ही कामे रद्द केल्याने शासनाच्या पैशांचा चुराडा तर झालाच आहे पण डोंबिवलीकरांनाही चांगल्या रस्त्यांपासून वंचित ठेवल्याचे पाप पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सांगत डोंबिवलीकर जनता हे लक्षात ठेवेल असा इशाराही आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा