Home ठळक बातम्या “उंची छलांग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है...

“उंची छलांग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है “- मनसे आमदार राजू पाटील यांनी मांडली भुमिका

कल्याण दि.10 एप्रिल :

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा घेत लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. नरेंद्र मोदींसाठी आम्ही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी या सभेत स्पष्ट केले. त्यावर मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू ऊर्फ प्रमोद पाटील यांनीही सोशल मीडियाद्वारे ” उंची छलांग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है ” अशा आशयाची भूमिका स्पष्ट केली आहे. (Mns mla raju patil expresses his opinion on mns chief Raj Thackeray s decision )

या सोशल मीडिया पोस्टमध्ये आमदार राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय, त्यासाठी देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, विकसनशील ते विकसित भारतापर्यंतचा झालेला बदल इथपासून ते देशांतील विरोधकांची अवस्था अशा सर्व मुद्द्यांवर परखड मते मांडली आहेत. तसेच या मुद्द्यांच्या आधारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली पाठिंब्याची भूमिका योग्यच कशी आहे यावरही आमदार पाटील यांनी भाष्य केले आहे.

आमदार राजू पाटील यांची ती पोस्ट…
कालच्या साहेबांच्या भाषणानंतर बऱ्यापैकी शंका कुशंकांचं मळभ दूर झालं असावं. खरंतर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे अंदाज बांधणाऱ्या लोकांनी कल्पनांचे इमले इतके भयानक आणि अतर्क्य बांधले होते की विचारता सोय नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाची धुरा वाहताना भूमिका मांडणं हे सोशल मीडियावर कुणाच्या तरी wall वर जाऊन आपली मतं मांडण्याइतकं (टर उडवण्याइतकं) सोप्पं नसतं. भूमिका ठरायला वेळ लागतो, विचारविनिमय करावा लागतो, भविष्यातील वाटचालींचा अंदाज घ्यावा लागतो.

महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थितीबद्दल अत्यंत स्पष्ट शब्दांत सन्माननीय राजसाहेबांच्या शैलीत खरपूस समाचार घेतला गेला आहेच. परंतु आगामी निवडणुका ह्या अखंड हिंदुस्थानच्या भविष्याची वाट ठरवणाऱ्या निवडणुका आहेत. विशेषतः आपला देश विकसनशील ते विकसित अशा संक्रमण अवस्थेतून जात असताना देशात नेतृत्व बदल होणे परवडण्यासारखं नाहीय. (आणि समजा जरी धोका पत्करायचा म्हटला तरी पर्याय कोण आहे ?) ह्यांना पराभूत करून जिंकून कोणाला देणार आहोत? आमच्या आगरी भाषेत म्हण आहे ‘खायाची मोत, पुन मिशीला तेल’ अशी मोदींच्या विरोधकांची अवस्था. ह्यांच्या नेतृत्वात आपल्या देशाचं काय भलं होणार?
शिवाय मोदींच्या कणखर निर्णयांनी देशाची प्रतिमा उजळली आहे, हे मी जेव्हा परदेशात गेलो होतो तेव्हा स्वतः अनुभवलं आहे. खिळखिळी अर्थव्यवस्था ते पहिल्या पाचात जाऊ शकणारी अर्थव्यवस्था, ३७० कलम रद्द करणे आणि माझ्या वैयक्तिक इच्छेतलं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे राम मंदिराचे निर्माण, देशातील डिजिटल क्रांती अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्याच पाहिजेत. सन्माननीय राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे वाईट आहे त्यावर कोरडे ओढाच, पण चांगलं आहे त्याचं कौतुक करण्याची सर्वच राजकारण्यांनी सवय घ्यायला हवी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताची आणि अस्मितेची बाजू उंचावणारा पक्ष आहेच पण सवाल जेव्हा देशाचा येतो तेव्हा प्राथमिकता हिंदुस्थानच असणार ना. शिवाय आम्हा सर्व मनसैनिकांच्या आवडत्या शैलीत बोट उंचावून साहेबांनी सांगितलंच आहे…..विधानसभेच्या तयारीला लागा. आणि शेवटचं पण महत्वाचं सांगतो. ‘उंची छलांग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है |’

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा