Home कोरोना ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतही नवे निर्बंध लागू ; असे आहेत नविन निर्बंध

ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतही नवे निर्बंध लागू ; असे आहेत नविन निर्बंध

कल्याण-डोंबिवली दि.26 डिसेंबर :
कोवीड रुग्णांसह ओमीक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये शुक्रवार रात्रीपासून नविन निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य सरकारपाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही शनिवारी रात्री उशिरा केडीएमसी क्षेत्रासाठी हे नवे निर्बंध लागू झाल्याचे आदेश काढले आहेत. ज्यामध्ये रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान जमावबंदीच्या आदेशासह सार्वजनिक कार्यक्रम आणि हॉटेलमधील आसन क्षमतेवरही मर्यादा घालण्यात आली आहे.

ओमीक्रॉनच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत आणि पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानूसार संपूर्ण राज्यात हे प्राथमिक स्तराचे हे निर्बंध लावण्यात आले आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून 15 ते 25 च्या आसपास स्थिरावलेली कल्याण डोंबिवलीतील कोवीड रुग्ण संख्याही या आठवड्यामध्ये थेट 38 पर्यंत पोहचल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यात ख्रिसमस, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून कोवीड संसर्गाचा धोकाही वाढण्याची शक्यता आहे.

कल्याण डोंबिवलीतही असे आहेत निर्बंध..

संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.

उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल इतके असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल. किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल तितक्या संख्येला एकाच वेळी उपस्थित राहण्याची परवानगी राहील.

उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा