Home क्राइम वॉच वीजपुरवठा खंडीत केलेल्या थकबाकीदारांकडून वीजचोरी ; 105 जणांवर गुन्हे दाखल

वीजपुरवठा खंडीत केलेल्या थकबाकीदारांकडून वीजचोरी ; 105 जणांवर गुन्हे दाखल

टिटवाळा उपविभागातील धडक कारवाईत ५४ लाखांची वीजचोरी उघडकीस

टिटवाळा दि.१० मे :
वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही चोरीची वीज वापरणाऱ्या १०५ थकबाकीदार ग्राहकांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. महावितरणच्या पथकाने टिटवाळा परिसरात केलेल्या धडक कारवाईत अशाप्रकारे तब्बल ५४ लाख ५६ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.

महावितरणच्या पथकाने टिटवाळा, मांडा, बल्याणी, अष्टविनायक चाळ, श्रीदेवी चाळ भागामध्ये थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजग्राहकांची तपासणी केली. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली.

टिटवाळा उपविभागातील या तपासणीत १०५ जणांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले. त्यानुसार संबंधिताना चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटीस देण्यात आली. परंतू विहीत मुदतीत या रकमेचा भरणा न झाल्याने संबंधितांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. टिटवाळ्याचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता निलेश महाजन आणि त्यांच्या टिमने ही कारवाई केली.

थकबाकीपोटी एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिलाचा भरणा आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. अशा ग्राहकांनी परस्पर वीजजोडणी, शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतल्याचे आढळल्यास असे ग्राहक आणि त्यांना वीज पुरविणारी व्यक्ती अशा दोघांविरुद्धही फौजदारी अथवा दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महावितरण तर्फे देण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा