Home ठळक बातम्या काय कामे केली विचारणाऱ्यांचा हिशेब आगामी केडीएमसी निवडणुकीत चुकता करणार – आमदार...

काय कामे केली विचारणाऱ्यांचा हिशेब आगामी केडीएमसी निवडणुकीत चुकता करणार – आमदार गणपत गायकवाड

कल्याण दि.3 सप्टेंबर :

कल्याण पूर्वेत आमदारांनी आतापर्यंत काय विकासकामे केली? असा प्रश्न विचारून लोकांची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांचा हिशेब आपण आगामी केडीएमसी निवडणुकीत चुकता करणार असल्याचा पलटवार आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीतील ‘निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन’ या पत्रकारांच्या संघटनेसोबत आमदार गणपत गायकवाड यांनी राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आदी प्रश्नांवर मनमोकळा संवाद साधला.

कल्याण पूर्वेतील जनतेने सलग 3 वेळा निवडून देत आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपण पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळी कल्याण पूर्वेतील परिस्थिती अतिशय बिकट अशी होती. मात्र आपण निवडून आल्यापासून इथल्या नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहोत. मात्र याठिकाणी शिवसेनेकडून होत असणाऱ्या कुरघोडीच्या राजकारणामूळे आपल्या अनेक चांगल्या विकासकामांना गती मिळू शकली नाही. एकीकडे विकासकामांना खीळ घालायचा आणि दुसरीकडे आमदारांनी काय कामं केली असे विचारत लोकांची दिशाभूल करायची. मात्र आगामी केडीएमसी निवडणुकीत विरोधकांना आपण त्यांच्या सर्व हिशेब चुकते करणार असल्याचा इशारा आमदार गायकवाड यांनी यावेळी दिला.

तर भाजप सरकार राज्यात सत्तेमध्ये असताना केडीएमसीला सर्वाधिक निधी मिळाला. मात्र जी कामे करणे आवश्यक होती ती शिवसेनेने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली आणि आता तीच कामे नावं बदलून केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची विकासकामे करण्याची मानसिकता नाहीये. गेल्या 10 वर्षांपासून इकडे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे आहे, गेल्या 7 वर्षांपासून खासदारही शिवसेनेचा आहे, कल्याण डोंबिवली महापालिकेतही शिवसेनेची सत्ता आहे. कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाने आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम केल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.

गणपत गायकवाड यांनी निधी आणला मग ती कामं होऊ द्यायची नाही अशी इकडे मानसिकता झाली आहे. मात्र ज्याप्रमाणे विकासासाठी वरिष्ठ नेते एकमेकांतील सर्व मतभेद विसरून एकत्र येतात त्याप्रमाणे कल्याण पूर्वेच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आमदार गायकवाड यांनी यावेळी बोलून दाखवली. तर आगामी केडीएमसी निवडणुकीत शिवसनेपेक्षा भाजपचे संख्याबळ नक्कीच वाढेल असा ठाम विश्वास व्यक्त करत शिवसेनेसोबत युती ही भाजपची सर्वात मोठी चूक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा