![20221201_141444](https://www.localnewsnetwork.in/wp-content/uploads/2022/12/20221201_141444.jpg)
कल्याण दि.१ डिसेंबर :
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूजवळ झालेल्या अपघातात कल्याणच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. आज सकाळी या सर्वांवर कल्याण पश्चिमेच्या लालचौकी स्मशान भूमीमध्ये अंत्य संस्कार करण्यात आले.
कल्याणच्या सांस्कृतिक चळवळीत महत्वाची भूमिका बजावणारे श्रीसत्यनारायण उर्फ बाबुशेठ अग्रवाल (वय ८० वर्षे) हे त्यांच्या पत्नी सुमित्रा (७८) आणि वहिनी आशा दीपक अग्रवाल यांच्यासह ब्रिझा कारने एका कार्यक्रमासाठी गुजरातला गेले होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हा कार्यक्रम आटोपून हे कुटुंब अहमदाबाद मार्गाने कल्याणकडे परतत होते. त्याचवेळी डहाणू परिसरात त्यांच्या गाडीची मालवाहू ट्रकला मागून धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यामध्ये गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात श्रीसत्यनारायण उर्फ बाबुशेठ अग्रवाल (वय ८० वर्षे) हे त्यांच्या पत्नी सुमित्रा (७८) आणि त्यांच्या वहिनी आशा दीपक अग्रवाल यांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे.
दरम्यान या सर्वांवर आज सकाळी कल्याण पश्चिमेच्या लालचौकी येथील स्मशान भूमीमध्ये अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.