Home ठळक बातम्या जागतिक वसुंधरा दिन : आता कल्याणचा रिंगरोड होणार हिरवागार

जागतिक वसुंधरा दिन : आता कल्याणचा रिंगरोड होणार हिरवागार

सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड

कल्याण दि.22 एप्रिल :
कल्याण ते टिटवाळा हा महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकल्पामुळे इथली वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासह या रस्त्याची पर्यावरण संवर्धनाचे नवे केंद्र अशी ओळख ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात या रिंगरोडच्या दुतर्फा तब्बल बाराशेहून अधिक वृक्ष लावण्यात येणार आहेत. आजच्या जागतिक वसुंधरा दिनाचे (world Earth day) औचित्य साधून दुर्गाडी चौक ते गांधारीपर्यंत साडेचारशे वृक्षांची लागवड करण्यात आली असून येत्या वर्षभरात हा रस्ता हिरवागार पाहायला मिळणार आहे.

महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासह कल्याणहून टिटवाळ्याला अवघ्या काही मिनिटांत जाता येणार आहे. वेगवेगळ्या टप्प्यात बनत असलेल्या या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तर कल्याणमधील दुर्गाडी चौक, सापार्डे, गांधारी, बारावे आदी गावातील दोन्ही बाजूचा रस्ता बनून तयार आहे.

कल्याण ते टिटवाळा मार्गावर दुतर्फा वृक्ष लावण्यात येणार…

या प्रकल्पासाठी अनेक शेतजमिनी आणि वृक्ष बाधित झाले असून त्याबदल्यात आंबिवली येथील टेकडीवर केडीएमसीकडून भले मोठे निसर्ग उद्यान बनवण्यात आले आहे. मात्र कल्याण आणि त्यापुढील इतर ज्या भागातून हा रस्ता जातो त्याच्या सभोवताली वनश्रीने नटलेला परिसर आहे. या वृक्ष संपदेचा विचार करता हा रस्ता काहीसा उघडा बोडका आणि अतिशय वैराण दिसत होता. या पार्श्वभूमीवर शेजारील निसर्गाशी अनुरूप होण्यासह त्याला पर्यावरण संवर्धनाची नवी ओळख देण्याच्या दृष्टीने रिंगरोडच्या कल्याण ते टिटवाळा मार्गावर दुतर्फा वृक्ष लावण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक आणि सचिव संजय जाधव यांनी दिली.

केवळ पर्यावरणपूरक वृक्षांची होणार लागवड…
रिंगरोडवर लावण्यात येणारे हे वृक्ष अजिबात शोभेचे वृक्ष नसून त्या प्रत्येक वृक्षाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यात येणार असल्याची माहितीही महापालिका जाधव यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्राचे राजवृक्ष अशी ओळख असलेल्या ताम्हाणसह कदंब, जांभूळ, मोहगणी, बकुळ अशी वेगवेगळी प्रजातीची वृक्ष संपदा बहरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात देव इंजिनिअरिंग लावणार बाराशे झाडं…
या वृक्ष लागवड संकल्पनेसाठी विविध सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. त्यापैकी देव इंजिनिअरिंग या नेव्हल गॅलरी आणि युद्धनौकेच्या स्मारकाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून पहिल्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारची पर्यावरणाशी समतोल साधणारी बाराशे झाडं लावण्यात येणार आहेत. तसेच पुढील वर्षभर याच संस्थेमार्फत या झाडांची देखभाल आणि निगा राखली जाणार असून ही आमच्या दृष्टीने आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया देव इंजिनिअरिंगच्या राजपुरोहित यांनी दिली.

यावेळी महापालिका सचिव संजय जाधव, उद्यान अधीक्षक अनिल तामोरे, देव इंजिनिअरिंगचे राज पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा