Home ठळक बातम्या केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामप्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामप्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

मंत्री उदय सामंत यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात माहिती

कल्याण ग्रामीण दि.२४ मार्च :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बनावट कागदपत्रांद्वारे इमारतींची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. तर सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आला हा प्रश्न आला असता याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शाळा, क्रिडांगणसारख्या आरक्षित जागांवर अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत. यापैकी काही अधिकृत बांधकामांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करण्यात आल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यावर मनसे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र देऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. याबाबत चौकशी सुरु असली तरी त्यात काही ठराविक लोकांचीच चौकशी केली जात असल्याचे सांगत या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची मात्र चौकशी होत नसल्याबाबत मनसे आमदार पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केलं होत. तसेच या संदर्भात त्यांच्यासह कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा करत याप्रश्नी विधानसभेत आवाज उठवला.

कल्याण डोंबिवलीमध्ये ६५ विकासकांनी बनावट कागदपत्रे सादर करून केडीएमसी आणि रेराची फसवणूक केली आहे. याप्रकरणी केवळ वास्तुविशारद आणि जमीन मालकांना दोषी धरण्यात आले असले तरी या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या केडीएमसीच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांवर महापालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे आमदार राजू पाटील आणि गणपत गायकवाड यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला.

त्यावर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा