Home ठळक बातम्या ” दगड भिरकावणाऱ्या नव्हे, तर दगड रचून इतिहास रचणाऱ्या प्रगतीशील तरुणाईची हवीय...

” दगड भिरकावणाऱ्या नव्हे, तर दगड रचून इतिहास रचणाऱ्या प्रगतीशील तरुणाईची हवीय साथ “

मुंबई – गोवा महामार्गाबाबतच्या पत्रातून मंत्री रविंद्र चव्हाण यांचा मनसेला टोला

डोंबिवली दि.22 ऑगस्ट :
मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून एकीकडे टीका केली जात असून मनसेकडून याविषयी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी मनसैनिकांनी तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी एक पत्र लिहून त्याद्वारे आपली भूमिका मांडली आहे. या महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती स्पष्ट करतानाच ” महाराष्ट्राला दगड भिरकावून तोडोफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको. आता त्याऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतीशील काम करणाऱ्या तरुणाईची साथ हवी” असल्याचे सांगत मनसेला टोला लगावला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्रातील मजकूर जसाच्या तसा…

दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला की विध्वंस होतो याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.

तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे…
जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो…? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक….. ? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे…. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे आहे…..

गणेशोत्सवासाठी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल…
मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून … दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे… अवघ्या महाराष्ट्राला…..

कडक उन आणि भर पावसात कामाची सलग आठ वेळा पाहणी …
कोकणचा सुपुत्र म्हणून अनेक लहान-मोठ्या समस्या जवळून बघितल्या होत्या. यातल्या अनेक समस्यांचं मूळ मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण हेच आहे, याची देखील जाणीव आहे. केंद्रात मोदीजी आणि राज्यात त्रिशुळ सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री या नात्याने पनवेल ते झाराप मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर कडक उन्हात आणि भर पावसात उतरून रस्ते कामाची सलग आठ वेळा पाहणी केलेला मी कोकणी माणूस आहे. भाजपाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे.

कार्यसिद्धी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही…
खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं ही स्वाभिमानी प्रतिज्ञा केली होती ती कार्यसिद्धी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे व्रत म्हणून स्वीकारलं आहे. या कामात असणाऱ्या असंख्य अडचणी सोडवणं हे शिवधनुष्यच होतं. पण कार्यभार स्वीकारताच कोकणवासियांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एकेक पाऊल उचलू लागलो. या कामातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत.

तोडाफोडीमुळे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत…
केवळ खड्डे न बुजवता CTB टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम दिला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं फोडण्यापर्यंत या श्रेयजीवींची मजल गेली आहे. या तोडाफोडीमुळे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे, अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरु असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशाप्रकारे आडकाठी आणून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे ? हा प्रश्नच आहे. गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाअखेरपर्यंत पूर्ण महामार्ग पूर्ण करणारच या निश्चयातूनच आपला विभाग काम करत आहे.

ते विनाशकारी नव्हे तर कोकणच्या विकासाची- प्रगतीची विचारसरणी फॉलो आणि लाईक करतील…
ज्या आदरणीय मोदीजींनी काश्मीरमधल्या दगडफेकू तरुणांच्या हाती रोजगार दिला, तेव्हाच त्यांची अनेक दशकांची विनाशकारी विचारसरणी बदलली आणि बदलली काश्मीरची अर्थव्यवस्था. त्याचप्रमाणे मोदीजींचा कट्टर अनुयायी म्हणून एक दिवस हीच मंडळी तोडफोडप्रेमी विनाशकारी विचारधारा सोडून कोकणच्या विकासाची आणि प्रगतीची विचारसरणी फॉलो आणि लाईक करतील ही आशा बाळगून आहे.

अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामामाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच मनसैनिकांनी केलेल्या तोडफोडीच्या प्रकारांचा शालजोडीतून समाचारही घेतला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा