Home ठळक बातम्या रस्त्यांवर नागरिकांना चालण्यासाठीही जागा उपलब्ध करून द्या – केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी...

रस्त्यांवर नागरिकांना चालण्यासाठीही जागा उपलब्ध करून द्या – केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड

पोलीस,रेल्वे,आरटीओ केडीएमसी अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्देश

कल्याण डोंबिवली दि.1 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, वाहन संख्येचा झालेला विस्फोट आणि या सर्वांचे नियमन आणि नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत चाललेल्या शासकीय यंत्रणा आणि तोकडे पडत चाललेले रस्ते. या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी पोलिस, वाहतूक पोलीस, रेल्वे प्रशासन, आरटीओ आणि केडीएमसी अधिकाऱ्यांची बैठक घेत नागरिकांना रस्त्यांवर चालण्यासाठी प्राधान्याने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

या विषयांवर झाली चर्चा…
कल्याण डोंबिवली परिसरात वाढत्या गरजेच्या अनुषंगाने सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे जाळे सक्षम करणे, वाहतुक कोंडी कमी करणे, पार्किंग धोरण, सिग्नल यंत्रणा आदी विषयांवर स्थायी समिती सभागृहात बैठक संपन्न झाली. या बैठकीस शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विजय राठोड, परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मध्य रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक, वाहतुक व्यवस्था, आरटीओचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

स्टेशन परिसरातील बजबजपुरी…
स्टेशन परिसरात रिक्षांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे, तसेच वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वेचे प्रतिनिधी, पोलीस, वाहतुक शाखा, महापालिकेचे प्रतिनिधी यांचे संयुक्त पथक बनवुन पार्किंग (P1, P2) रिक्षा स्टॅन्ड याबाबत धोरण ठरविण्यात यावे. जेणेकरुन वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

शहरातील सिग्नल यंत्रणा…
शहरातील सिग्नल यंत्रणा सुरळीतरित्या कार्यान्वित ठेवण्यासाठी महापालिका – पोलीस यंत्रणा यांनी आपापसात समन्वय ठेवावा. आणि जास्त प्रमाणात वाहतुक कोंडी होणा-या ठिकाणी त्यावेळी सिग्नलसाठी वेळेचे स्लॉट ठरवुन देण्याची सूचनाही आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी केली.

मार्केट परिसरात पे ॲन्ड पार्क…
गर्दीच्या ठिकाणी मुख्यत: मार्केट परिसरात पे ॲन्ड पार्क योजना चालु करावी, अशा सूचना ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त डॉ.विजय राठोड यांनी दिल्या. संदर्भात पोलीस विभागाने यासाठी संबंधित परिसर निश्चित करुन द्यावा, जेणेकरुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले.

दरम्यान कल्याण असो की डोंबिवली, या दोन्ही शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक अतिशय जटील बनत चालली आहे. काही वर्षांपूर्वी केवळ दोन्हीकडील स्टेशन परिसर हा वाहतूक कोंडीने त्रस्त ओळखला जायचा. परंतू इथली वाहतूक कोंडी काही केल्या सुटली तर नाहीच उलट आता शहरांतील अंतर्गत रस्ते आणि चौकापर्यंत या वाहतूक कोंडीचा विस्तार झाला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील (जुन्या भागांतील)काही रस्ते हे येत्या काळात केवळ चालण्यासाठीच आरक्षित करावे लागणार आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा