Home ठळक बातम्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्याने कल्याण- टिटवाळ्याचा पाणी पुरवठा राहणार बंद

जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्याने कल्याण- टिटवाळ्याचा पाणी पुरवठा राहणार बंद

 

कल्याण दि.13 जुलै :
आज दिवसभर होत असणाऱ्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे टिटवाळा जलशुद्धीकरण आणि मोहीली जलशुध्दीकरण केंद्रामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे कल्याण पूर्व – पश्चिम आणि टिटवाळा गावातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पाणी शिरल्यामुळे आज दुपारी 2.00 वाजल्यापासून ही जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे उद्या टिटवाळा गाव ते अंगण सोसायटी या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तर 100 द.ल.ली मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे तेथील पम्पिंगदेखील बंद करण्यात आले आहे. परिणामी कल्याणमधील पाणीपुरवठा सध्या बंद करण्यात आला आहे.

कल्याणातील या भागात उद्या पाणी नाही…
उद्या कल्याण पश्चिमेतील घोलप नगर, योगीधाम, मुरबाड रोड, रामबाग लेन नंबर 1 ते 6, चिकनघर, सिंधिकेट, फॉरेस्ट कॉलनी, मिलिंद नगर, सह्याद्रीनगर, बिर्ला कॉलेज रोड, भोईरवाडी, खडकपाडा सर्कल पर्यंत, संतोषी माता रोड, रीजन्सी सोसायटी गायत्री धाम सावरकरनगर ,इंदिरानगर मांडा ,पश्चिम बल्यानी, मोहिली, गाळेगाव आर एस टेकडी ,मोहने, अटाळी वडवली ,शहाड ,अंबिवली गाव ,उंबरणी या परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

तर कल्याण पूर्व येथील अशोक नगर, शिवाजीनगर वालधुनी या भागात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा विभाग कल्याणचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली आहे.

जलशुद्धीकरण केंद्रातील पम्पिंगची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कल्याणमधील पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच काही काळ पाणीपुरवठा गढूळ स्वरूपात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा