Home ठळक बातम्या डोंबिवलीत विठुरायाच्या कैवल्यवारीत ‘अवघा रंग एक झाला’

डोंबिवलीत विठुरायाच्या कैवल्यवारीत ‘अवघा रंग एक झाला’

 

डोंबिवली दि.२ मे :
आषाढीवारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘कैवल्यवारी’ या वारीच्या प्रवासावर आधारित सादर झालेल्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाला डोंबिवलीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झालेल्या या विठ्ठलभक्तीच्या नादब्रह्मात रसिक प्रेक्षक न्हाऊन निघाले.

श्रिया क्रिएशन आणि वायर्ड एक्सप्रेशन निर्मित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे यांनी दिवेघाटाचे वर्णन करणारे चालू सोबतीने वाट,चढू अवघड दिवघाट यासोबतच ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हे गीत सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तर सावनी शेंडे यांनीही अतिशय बहारदार गायन करत मैफिलीत भक्तीरंग भरला तो ‘अवघा रंग एक झाला’ या गाण्यातून.

याशिवाय विलास कुलकर्णी आणि अवधूत गांधी यांनी गायलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याला उपस्थितांची विशेष दाद मिळाली. यासोबतच विलास कुलकर्णी यांनी कैवल्यवारी अल्बममधील ‘येतो परतुनी देवा, माझी आठवण ठेवा’ हे विठ्ठल भेटीनंतर त्याचा निरोप घेतानाचे गीत सादर केले. कार्तिकी गायकवाडने गवळण आणि काही संत रचना सादर करत या कैवल्यवारीमध्ये भक्तिरसाची उधळण केली. यावेळी डॉ. वृषाली दाबके आणि त्यांच्या शिष्यांनी मिळून कैवल्यवारीतील काही गाण्यांवर सादर केलेल्या अतिशय सुंदर नृत्याविष्कारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कैवल्यवारीतील सर्व गाणी वर्षा राजेंद्र हुंजे यांनी लिहिली आहेत. तर याच कार्यक्रमात चित्रकार उमेश पांचाळ यांनी एकीकडे भक्तिगीते सादर होताना त्याचवेळी विठ्ठलाचे अप्रतिम लाइव्ह पेंटिंग काढले. या कैवल्यवारीचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी ११ प्रयोग करण्याचे नियोजन असल्याचे आयोजकांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा