Home ठळक बातम्या मोठागाव ते दुर्गाडी किल्लादरम्यानचे तासभराचे अंतर येणार काही मिनीटांवर

मोठागाव ते दुर्गाडी किल्लादरम्यानचे तासभराचे अंतर येणार काही मिनीटांवर

 खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याने ५३१ कोटींची निविदा जाहीर

डोंबिवली दि. २६ डिसेंबर :

डोंबिवलीपासून थेट टिटवाळा हा कष्टदायक प्रवास अवघ्या सुमारे तीस मिनिटांच्या प्रवासावर आणणारा आणि कल्याण- डोंबिवली  शहरांवर आमुलाग्र परिणाम करणारा महत्वाकांक्षी कल्याण रिंगरोड प्रकल्प प्रगतीपथावर आहे. यातील मोठागाव ते दुर्गाडी पुल या टप्प्याच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने बांधकामकंत्राटदार नेमण्या साठी निविदा सुचना प्रसिद्ध नुकतीच करण्यात आली आहे. सुमारे सहा किलोमीटरच्या या प्रस्तावित बाह्यवळण मार्गामुळे डोंबिवली  शहरामधील मोठा गाव ते दुर्गाडी किल्ला हा सुमारे १०  किलोमीटरचा प्रवास एका तासावरून अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएने बांधकाम  कंत्राटदार नेमण्यासाठी ५३१ कोटी ६८ लाखांची निविदा प्रसिद्ध केली आहे.

रिंगरोड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर…
डोंबिवली, कल्याणसह आसपासच्या शहरांच्या आणि मुंबई-ठाणे-नाशिक-आग्रा राज्यमार्गांच्या कनेक्टिव्हीटीला बळ देणाऱ्या सुमारे  ३० किमी लांबीच्या कल्याण – डोंबिवली-टिटवाळा रिंगरोड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे त्यावर विशेष लक्ष ठेवून असून विविध टप्प्यांची सद्यस्थिती,  प्रकल्पातील अडचणी जाणून घेण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे  सातत्याने एमएमआरडीए अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत.

निविदा जाहीर करण्यासाठी खा. शिंदेकडून पाठपुरावा…

काही कालावधीपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची भेट घेत कल्याण रिंगरोड प्रकल्पातील  महत्वपूर्ण अशा मोठा गाव ते दुर्गाडी किल्ला या तिसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला सकारात्मक  प्रतिसाद देत एमएमआरडीएच्या माध्यमातून नुकतीच या तिसऱ्या  टप्प्यातील कामाची निविदा सुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ५३१ कोटी ६८ लाख रूपये अंदाजित खर्चातून हे काम केले जाणार आहे. या मार्गाच्या उभारणीमुळे  मोठागाव ते दुर्गाडी हे अंतर एका  तासावरून थेट सुमारे सहा मिनिटांवर येणार आहे.

प्रवास विनाअडथळा आणि वेगवान होणार…

सध्याच्या घडीला डोंबिवली मोठागाव या भागातून कल्याणमधील  दुर्गाडी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी सध्या मोठा  वळसा घेउन एक तासाचा वेळ लागतो. या परिसरामधील नागरिकांना  शिळफाटा किंवा ठाकुर्ली या मार्गाने मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. मात्र कल्याण रिंगरोडच्या या तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पामुळे हा प्रवास विनाअडथळा आणि वेगवान होणार आहे.

पर्यावरणाचा समतोल राखूनच मार्गाची निर्मिती…

या सहा किलोमीटरच्या मार्गात सुमारे २ किलोमीटरचा मार्ग हा खाडी किनारी स्टील्ट रस्त्याच्या स्वरूपात असणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखून हा मार्ग उभारला जातो आहे. चार किलोमीटरचा रस्ता जमीनीलगत असणार आहे. या मार्गामुळे  आणि पुर्णत्वावर असलेल्या मोठागाव – माणकोली  जोडरस्त्यामुळे डोंबिवलीच्या एका टोकाला असलेला मोठागाव हा परिसर थेट  मुख्यस्थानी येणार आहे. या मार्गामुळे डोंबिवलीतील प्रवाशांना कल्याण आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवघ्या दहा मिनीटात जाता येईल.

डोंबिवली शहरासाठी गेमचेंजर प्रकल्प…
डोंबिवली मधील मोठागाव आणि आसपासचा परिसर डोंबिवली शहराच्या एका टोकाला आहे. मात्र माणकोली -मोठागाव जोड रस्ताआणि मोठागाव – दुर्गाडी पुल हा कल्याण रिंगरोड प्रकल्पाचा  तिसरा टप्पा डोंबिवलीसाठी गेमचेंजर ठरणार आहे. या भागाला थेट कनेक्टिव्हीटी नाही. हा पूल आणि तिसऱ्या टप्प्यातील मार्गामुळे  डोंबिवलीचा हा परिसर प्रमुखभागी येणार आहे.
डोंबिवली शहरामधुन मुंबई, ठाणे शहर येथे पोहोचण्यासाठी आणिमुंबई नाशिक आग्रा महामार्ग अवघ्या दहा मिनीटांच्या प्रवासावर येणार आहे. पर्यायाने शीळफाटा येथील वाहतुक गर्दी कमी होण्यासही मदत होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी सकारात्मक मदत करावी असे जाहीर आवाहनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा