Home ठळक बातम्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा निर्णय ; विजबिलं भरण्याचे आवाहन

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा निर्णय ; विजबिलं भरण्याचे आवाहन

 

मुंबई दि.19 जानेवारी :

वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे आणि थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास दिले आहेत. त्यामुळे वीजबिलांमध्ये कपात किंवा सूट मिळण्याच्या सर्व शक्यता मावळल्या आहेत.

डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीजबिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. डिसेंबर अखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणीज्यिक, घरगुती आणि औदयोगिक ग्राहकांकडे 8 हजार 485 कोटी रुपये तसेच उच्चदाब ग्राहकांकडे 2हजार 435 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मूळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता. राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.

मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात खासगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रीतसर परवानगी घेऊन सप्टेंबर 2020 मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई आणि मुंबई उपनगरात सुरू करत थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला. मात्र राज्याचे उर्जामंत्री डॉ. राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणला निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची आणि इतर देणी तसेच कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अशक्य झाल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी – कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

तर महावितरणच्या या नव्या आदेशांवरून विरोधी पक्ष पुन्हा याबाबत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा