Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी दिली ही शिक्षा

कल्याण डोंबिवलीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी दिली ही शिक्षा

कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक पोलिसांचा उपक्रम

कल्याण-डोंबिवली दि. २२ एप्रिल :
एकीकडे रस्ते अपघात वाढत असून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलीस आणि शासन वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे. परंतु त्यानंतरही नागरिक काही एकायचे नाव घेत नसल्याने अखेर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांकडूनच पोलिसांनी जनजागृती करत वेगळी शिक्षा दिल्याचे कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळाले. कल्याणच्या दुर्गामाता चौकात वाहतूक पोलिसांनी हा अनोखा उपक्रम राबवला.

सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे किंवा सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे असे प्रकार वाहन चालक सर्रासपणे करत असल्याचे दिसतात. वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू पाहता काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने वाहतूक नियम मोडणाऱ्या शिक्षेच्या आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. मात्र त्यानंतरही वाहन चालक हे नियम पाळत नसल्याने ठाणे वाहतूक पोलिसांनी अखेर वेगळ्या पद्धतीने त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांच्या हाती दंडाचे चलान न देता वाहतूक नियम पाळण्याबाबत संदेश देणारे बॅनर हातामध्ये देऊन १५ मिनिटे उभे राहण्याची शिक्षा करण्यात आल्याची माहिती कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. त्यानुसार अनेक वाहन चालक हातामध्ये नियम पाळण्याचे संदेश घेऊन भर उन्हात उभे राहिलेले दिसून आले. साधारणपणे आज तब्बल ८०० ते १ हजार नागरिकांना अशा प्रकारची अनोखी शिक्षा देऊन आणि समुपदेशन करून सोडण्यात आले. तर ज्यांनी ही जनजागृती करण्यास असमर्थता दर्शवली किंवा नकार दिला अशा ५५ वाहन चालकांना ई चलानच्या माध्यमातुन कार्यवाही करून दंड वसूल केल्याची माहितीही तरडे यांनी दिली.

दरम्यान किमान या शिक्षेनंतर तरी आता नागरिक वाहतुकीचे नियम पाळतील अशी अपेक्षाही वाहतुक पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा