Home ठळक बातम्या आगामी केडीएमसी निवडणुकीत मनसे निर्णायक स्थितीत असणार – मनसे आमदार राजू पाटील

आगामी केडीएमसी निवडणुकीत मनसे निर्णायक स्थितीत असणार – मनसे आमदार राजू पाटील

“शिवसेना आणि भाजपच्या विरोधावर आपला विश्वास नाही”

कल्याण – डोंबिवली दि.9 सप्टेंबर :
गेली इतकी वर्षे शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीच्या विकासाऐवजी सुरू असणाऱ्य भावनिक खेळाच्या राजकारणाला लोकं कंटाळली असून आगामी केडीएमसी निवडणुकीत मनसे निर्णायक स्थितीत असेल असा ठाम विश्वास मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला. आगामी केडीएमसी निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन’तर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मनसे आमदार पाटील यांनी विकासकामांसह दि.बा. पाटील नामकरण, केडीएमसी निवडणूक, शिवसेनेचे राजकारण, 27 गावे, पोलिसांची दडपशाही, सेना-भाजप विरोध, केडीएमसी आयुक्त आदी ठळक विषयांवर बेधडकपणे आपली मते व्यक्त केली.

दिबांच्या नावाला केलेल्या विरोधाचे परिणाम लवकरच दिसणार…
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे. मात्र कोणाचीही मागणी नसताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे करून विरोधी भूमिका घेतल्याने इथला आगरी समाज कमालीचा नाराज झाला आहे. आगरी समाजाचा हा राग त्या पक्षावर नसेल मात्र या व्यक्तीमुळे तो पक्षावर निघेल आणि येत्या काळात त्याचे परिणाम दिसतील असा सूचक इशारा आमदार राजू पाटील यांनी यावेळी शिवसेनेला दिला.

पक्षातून केवळ नेते गेले आमचे कार्यकर्ते भक्कम आहेत…
मनसे आपली क्षमता पाहून काम करत असून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची पक्षाकडे कोणतीही कमी नाहीये. काही महिन्यांपूर्वी पक्षातून केवळ नेते गेले आहेत. बाकी आमची ताकद असणारे निष्ठावान कार्यकर्ते हे सदैव मनसेसोबत आहेत आणि असतील असे आमदार पाटील म्हणाले.

जाणून बुजून आपली कामे अडवली जात आहेत…
केडीएमसी क्षेत्रात असूनही आपल्या मतदारसंघावर प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. मग तो पाण्याचा प्रश्न असो आरोग्याचा असो की रस्त्यांसारख्या मूलभूत सोयी सुविधेचा. जाणून बुजून आपल्या कामांना अडथळे निर्माण केले जात आहेत. मात्र असे केल्याने आम्ही खचून जाऊ असे त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. आमची जेवढी जास्त अडवणूक कराल त्याच्या दुप्पट ताकदीने आम्ही तुमच्यासमोर उभे राहू असेही आमदार राजू पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेना – भाजपच्या विरोधावर आमचा विश्वास नाही…
सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असणाऱ्या विरोधाच्या राजकारणावर आपला अजिबात विश्वास नाहीये. ते कधीही एकमेकांना डोळा मारतील त्यामूळे त्यांचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो ,असे सांगत त्यांनी आमदार पाटील यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.

सत्तेसाठी मनसेने लाचारी आणि नैतिकता सोडली नाही…
मनसेने सत्तेसाठी कधीही शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही की नैतिकता सोडून आपले निर्णय बदलले नाहीत. सत्तेसाठी वेळ पडली असती तर त्यांनी एमआयएमशीही हातमिळवणी केली असती. आम्हाला राज साहेबांच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार समजतात. त्यातून आपण एकच म्हणू शकतो की सत्तेसाठी त्यांनी एवढे खालची पायरी गाठायला नको होती असे सांगत शिवसेनेच्या महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापनेच्या निर्णयावर आमदार पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

पोलीस बळाचा वापर करून सूडबुद्धीचे राजकारण…
या सरकारच्या काळात पोलिसांचा सूडबुद्धीने वापर केला जात आहे. कधी नव्हे ते पोलीस प्रशासन या सरकारच्या काळात बदनाम झाले असून तो पोलीस यंत्रणेचा दोष नाहीये. तर या सरकारचा दोष आहे. मात्र कितीही केसेस केल्या तरी आम्ही डगमगणार नाही. आमचे काम सुरूच राहणार.

लोकसभा निवडणुकीत नक्कीच बदल घडवणार…
आम्ही लोकसभेच्या निवडणुका लढणार नसल्याचे राज ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. परंतु एक मात्र आपण निश्चित सांगू शकतो की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही बदल घडवणार. या निवडणुकीत मनसे फॅक्टर हा निर्णायक स्थितीत असेल असे आमदार पाटील यावेळी म्हणाले.

आगामी निवडणुकीत आम्ही त्यांनी जी आश्वासने दिली होती त्याबद्दल त्यांना जाब विचारणार. त्यांनी भावनिक मुद्दे दाखवले तर आम्ही रस्त्यावरचे खड्डे दाखवून जाब विचारणार आणि तेच सर्व मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे आमदार राजू पाटील म्हणाले.

यावेळी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, हर्षद पाटील, सुदेश चुडनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा